अमृतवाहिनी बँकेची शेतकऱ्यांना कायम मोठी मदत – आमदार बाळासाहेब थोरात

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँकेची 42 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

प्रतिनिधी —

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी स्थापन केलेल्या अमृतवाहिनी बँकेने कायम शिस्त, काटकसर, पारदर्शकता व रिझर्व बँकेच्या सर्व नियमांचे पालन केले असून उत्कृष्ट कामकाज करत तालुक्यातील शेतकरी व सर्वसामान्य यांना मोठी मदत केली असल्याचे गौरवोद्गार माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेच्या 42 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी हे होते. तर व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्री थोरात, रणजितसिंह देशमुख, मधुकरराव नवले, आर बी राहणे, व्हा. चेअरमन ॲड. नानासाहेब शिंदे, संचालक किसनराव सुपेकर, संजय थोरात, राजेंद्र काजळे, ॲड. लक्ष्मण खेमनर, कचरू फड, शिवाजी जगताप, बापूसाहेब गिरी, अविनाश सोनवणे, बाबुराव गुंजाळ, प्राचार्य विवेक धुमाळ, किसनराव वाळके, शांताराम फड, अण्णासाहेब शिंदे, कमल मंडलिक, ललिता दिघे, उबेद शेख, राजू गुंजाळ, गोरख कुटे, मुख्य कार्यकारी अधिकारी अंबादास वाणी आदी उपस्थित होते.

आमदार थोरात म्हणाले की, आपल्या सर्व वार्षिक सर्वसाधारण सभा ह्या चांगल्या होतात. सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन प्रगतीची चर्चा करतात. बँकिंग या क्षेत्राला रिझर्व बँकेचे मोठे निर्बंध आहेत .त्याचे काटेकोर पालन करून या बँकेने अत्यंत चांगले कामकाज करताना शेतकरी व गोरगरिबांना मदत केली आहे. कर्ज वितरण करताना परतफेड होणे अत्यंत महत्त्वाची आहे. बँकेच्या आठ शाखा कार्यरत असून आगामी काळात राहाता व निमोण येथेही शाखा सुरू केल्या जाणार आहेत.

दूध संघाच्या वतीने उत्पादक शेतकऱ्यांकरिता कमी दराने आठ कोटी रुपये कर्ज वितरण केले. यामुळे अनेक दूध उत्पादकांना दूध वाढीसाठी फायदा झाला आहे. तर साखर कारखान्याच्या सहकार्याने आता अमृत विजय सोलर कृषी पंपासाठी योजना दिली जाणार आहे.

संगमनेर तालुक्यामध्ये सुमारे दहा हजार शेततळे असून या शेततळ्यांवर सोलर पंप बसवल्यास ठिबक सिंचनाच्या माध्यमातून आपल्याला आणखी फळबागा व पिके फुलवता येणार आहे. आर्थिक नियोजन, काटकसर आरबीआयचे सर्व निर्बंध जपताना संगणकीकरण, तात्काळ सेवा अशा सर्व सुविधा पुरवताना बँकेने आठशे कोटींपेक्षा जास्त व्यवहार आर्थिक वर्षात करून दमदार वाटचाल केली असल्याची ही ते म्हणाले.

तर डॉ. तांबे म्हणाले की, राज्यामध्ये जवळपास 2000 बँका आहेत. त्यापैकी चांगले नेतृत्व नसल्यामुळे 500 बँका बुडालेल्या आहेत. ज्या ठिकाणी नेतृत्व चांगले आहे त्या ठिकाणी सहकाराच्या माध्यमातून गोरगरिबांना मदत होते. आमदार थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरचा सहकार हा देशासाठी पॅटर्न ठरला असून बँक व इतर सहकारी संस्थांची वाटचाल ही कौतुकास्पद ठरणारी आहे.

चेअरमन सुधाकर जोशी म्हणाले की, आमदार थोरात यांच्या नेतृत्वाखाली अमृतवाहिनी बँकेने आर्थिक दृष्ट्या सक्षम होताना उत्कृष्ट नियोजन करत शेतकऱ्यांना मोठी मदत केली आहे. राज्यपातळीवर या बँकेचा लौकिक झाला असून आगामी काळात अमृत मिलेनियर व अमृत विजय सौर कृषी पंप योजना सुरू केली असून या योजनेचा सभासद व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.

यावेळी विष्णुपंत रहाटळ, अशोक हजारे, विठ्ठलदास असावा, हौशीराम सोनवणे, सुभाष सांगळे, विलास कवडे, संतोष हासे, राजेंद्र चकोर, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, डॉ.सुजित खिलारी यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. या सभेचे नोटीस वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी अंबादास वाणी यांनी केले तर ॲड. नानासाहेब शिंदे यांनी आभार मानले.

आमदार थोरात यांचा चरखा देऊन सत्कार

स्वातंत्र्यप्राप्तीसह देश हिताचे अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेणाऱ्या काँग्रेसच्या सर्वोच्च राष्ट्रीय वर्किंग कमिटीवर आमदार बाळासाहेब थोरात यांची निवड झाल्याबद्दल बँकेच्या वतीने चरखा, स्वातंत्र्यसंग्रामातील दुर्मिळ पुस्तके, गांधी टोपी व तिरंगा पटका देऊन आमदार थोरात यांचा गौरवपूर्ण सत्कार केला

अमृत विजय व मिलेनियर योजनेचा प्रारंभ

शेतकऱ्यांसाठी अमृत विजय कृषी सौर पंप योजना कारखान्याच्या सहयोगातून सुरू करण्यात आली असून अमृत मिलेनियर ठेव योजनेमधून पाच वर्ष व दहा वर्षाच्या ठेवीतून आकर्षक योजना जाहीर करण्यात आली आहे याचबरोबर ऑनलाइन पद्धतीने आमदार थोरात यांच्या हस्ते क्लिक करून सर्व ठेवीदारांना 8% डिव्हीडंडचा एसएमएस पाठवण्यात आला.

 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!