माझ्या कामाची पद्धत आवडत नसेल तर बदली करून घ्यावी….

 

“माझ्या कामाची पद्धत एखाद्या अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला आवडत नसेल तर त्यांनी बदली करून घ्यावी. मात्र सामान्य नागरिक, लाडक्या बहिणी आणि बांधकाम कामगारांच्या हक्काचा एक रुपयाही कुणाला खाऊ देणार नाही. शासना च्या योजनांचा लाभ थेट पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलाच पाहिजे. मध्यस्थ, एजंट किंवा भ्रष्टाचाराच्या माध्यमातून गोर गोरगरीबांच्या हक्कावर डल्ला मारणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही.” — आमदार अमोल खताळ

 

संगमनेर / प्रतिनिधी –

बांधकाम कामगार, घरगुती कामगार, सुतार, इलेक्ट्रिशियन, रंगकाम करणारे कामगार तसेच बांधकाम क्षेत्राशी संबंधित सर्व घटक हे कामगार योजनेत बसत आहे हे कामगार खऱ्या अर्थाने राज्य आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा कणा आहेत. त्यांच्या कष्टांमुळेच विकासाची गती टिकून आहे. त्यामुळे शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्या साठी महायुती सरकार कटिबद्ध असून कामगारांचा एक रुपयाही कुणाला खाऊ देणार नाही असा स्पष्ट इशारा आमदार अमोल खताळ यांनी दिला आहे.

संगमनेर येथील मातोश्री लॉन्समध्ये आयोजित बांधकाम कामगारांना आमदार खताळ यांच्या हस्ते भांडी साहित्य वाटप करण्यात आले त्या वेळी ते बोलत होते. यावेळी भीमराज चत्तर, तालुका अध्यक्ष गुलाब भोसले, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष रऊफ शेख, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष रोहित चौधरी, शिवसेनेचे जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे, शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी, आरपीआय शहराध्यक्ष कैलास कासार, युवासेना उपजिल्हाप्रमुख सौरभ देशमुख, तालुकाप्रमुख सुशील शेवाळे, शहर प्रमुख सार्थक शेवाळे, सीताराम पानसरे, रवी म्हस्के सुरेश काळे, नगरसेविका साक्षी सूर्यवंशी, महिला उपजिल्हा प्रमुख दिपाली वाव्हळ, संगीता पुंड, सपना जाधव, बांधकाम विभागाचे अधिकारी स्वप्नील जाधव, ललित दाभाडे, निखिल सौंदारे उपस्थित होते.

आमदार खताळ म्हणाले की, महायुती सरकार सामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून काम करत आहे. शासनाच्या योजना केवळ काही मोजक्या लोकांपुरत्या मर्यादित न राहता सामान्य शेतकरी, कामगार व कष्टकरी कुटुंबांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. सध्या २६ हजार ८९९ बांधकाम कामगारांची नोंदणी झाली असून कामगार विभागाशी निगडित असणाऱ्या २१ प्रकारच्या योजनां साठी पात्र कामगारांनी नोंदणी केली तर ही संख्या ५० हजारांपर्यंत जाऊ शकते. गेल्या काही वर्षांत शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक आणि आर्थिक योजनांअंतर्गत बांधकाम कामगारांना तब्बल १२ कोटी २७ लाख रुपयांचा लाभ देण्यात आला असल्याचे खताळ यांनी यावेळी सांगितले.

एजंटांकडून पैसे घेणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करा

संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील साकूरजवळील मांडवे गावात एजंट बांधकाम कामगारां कडून पैसे घेत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. याप्रकरणी ज्यांनी पैसे घेतले आहेत, त्यांची बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करून संबंधित एजंटवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा, असे निर्देश आमदार खताळ यांनी अधिकाऱ्यांना दिले. जनसंपर्क कार्यालयामार्फत बांधकाम कामगारांची नोंदणी तसेच विविध योजनांचे अर्ज पूर्णपणे मोफत भरून दिले जातात. त्यामुळे कोणत्याही एजंटला किंवा मध्यस्थाला पैसे देण्याची आवश्यकता नाही शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी थेट माझ्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!