वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धन हे मानवतेचे काम – आमदार थोरात
दंडकारण्य अभियानाचा पेमगिरी येथे प्रारंभ
प्रतिनिधी —
स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या दंडकारण्य अभियानामुळे तालुक्यात वृक्षारोपण व संवर्धन संस्कृती वाढली आहे. पर्यावरण संवर्धन अत्यंत महत्त्वाचे असून हे मानवतेचे काम आहे. सर्वांच्या सहभागामुळे दंडकारण्य अभियान ही पर्यावरण संवर्धनाची मोठी लोकचळवळ ठरली असल्याचे प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

पेमगिरी येथील चंदनगड येथे पेमगिरी ग्रामस्थ व शेतकी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 19 व्या दंडकारण्य अभियान प्रारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी समवेत मुख्य प्रवर्तक डॉ सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्री थोरात, रणजीतसिंह देशमुख, संपत डोंगरे, शंकर खेमनर, सुधाकर जोशी, सोमेश्वर दिवटे, विष्णुपंत रहाटळ, विलास कवडे, सुनील कडलग, सोमनाथ गोडसे, अर्चना बालोडे, मीरा शेटे, निशा कोकणे, जगन्नाथ घुगरकर, अनिल थोरात, उपविभागीय वन अधिकारी संदीप पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी गायकवाड, प्रवीण गोसावी आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार थोरात म्हणाले की, 2006 मध्ये सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी दंडकारण्य अभियान सुरू केले. दरवर्षी कोट्यावधी बियांचे रोपण केले लक्षावधी वृक्षांचे रोपण केले. कमी पाऊस आणि जास्त उन्हाळा यामुळे वृक्ष संवर्धनावर परिणाम होतो. मात्र तरीही मागील एकोणावीस वर्षांमध्ये तळेगाव भागासह उघडे बोडके डोंगर आता झाडांमुळे हिरवेगार दिसू लागले आहेत.
कोळवाडे येथील फादर हर्मन हिल, खांडगाव,
पिंपळगाव कोंझिरा, चंदनापुरी, देवगड या ठिकाणांमधील डोंगरही वृक्षारोपणामुळे सहलीचे ठिकाणे ठरत आहेत. तालुक्यामध्ये वृक्ष संवर्धन संस्कृती वाढली आहे. झाडे जपणे ही आता लोकचळवळ झाली आहे. पर्यावरण संवर्धन आणि वृक्षारोपण हे मानवतेचे काम आहे. ही वसुंधरा अधिक समृद्ध करण्यासाठी या लोकचळवळीत सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले

डॉ. तांबे म्हणाले की, सहकारातील विविध संस्थांनी तालुक्यातील वेगवेगळे डोंगर निश्चित केले असून त्यावर वृक्षारोपण व संवर्धन सुरू आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी दिलेली ही पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी आपल्या सर्वांना पुढे न्यायची आहे यामध्ये विद्यार्थ्यांनी अधिक सहभाग घ्यावा असे आवाहन केले.

दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, संगमनेर तालुका हा सह्याद्रीच्या पायथ्याशी असून तालुक्यातील विविध डोंगरांवर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले आहे. आता ही डोंगर हिरवीगार दिसू लागल्याने संगमनेर तालुक्याची ओळख हिरवा तालुका म्हणून आगामी काळात होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला
याप्रसंगी सचिन दिघे, संतोष नागरे, मारुती कवडे, भास्कर गोपाळे, समीर कोल्हे ,शांताराम डूबे, सरपंच द्वारका डूबे, पांडुरंग डूबे, बाळासाहेब मस्के, रोहिदास कोल्हे, मुख्याध्यापक प्रकाश गोडसे, बबन सावंत, बाळासाहेब फापाळे, प्रा बाबा खरात आदींसह अमृत उद्योग समूहातील विविध पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत संदीप दुबे यांनी केले. प्रास्ताविक सोमनाथ गोडसे यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. यावेळी पेमगिरी व पंचक्रोशातील नागरिक ग्रामस्थ महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
