जयहिंदच्या माध्यमातून विज्ञाननिष्ठ पिढी घडेल – माजी आमदार डॉ. सुधीर तांबे 

संगमनेर प्रतिनिधी —

निरोगी आणि सुदृढ समाजनिर्मितीसाठी कार्यरत असलेल्या ‘जयहिंद लोकचळवळ’च्या माध्यमातून सक्षम देश निर्माण व्हावा याकरता विज्ञाननिष्ठ पिढी घडवण्याचे उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले आहे.

मॉडेल स्कूलमध्ये पाचदिवसीय निवासी युवा सर्वांगीण विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, 11 ते 16 वयोगटातील 100 विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांकडून प्रशिक्षण दिले जात आहे. आजपासून सुरू झालेले हे शिबिर पुढील पाच दिवस चालणार आहे.

या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी संस्थापक माजी आमदार डॉ. तांबे म्हणाले की, मोबाईलच्या अतिवापरामुळे विद्यार्थी एकलकोंडे होत आहेत. खरे तर मुलांनी मैदानाकडे वळले पाहिजे कारण आरोग्य आणि मानसिकता याकरता व्यायाम महत्त्वाचा आहे. सध्या स्पर्धेचे युग आहे. स्पर्धेमध्ये टिकून राहण्याकरता सक्षम आणि कणखर मानसिकता महत्त्वाची आहे. यश आणि अपयश पचवण्याबरोबर विद्यार्थ्यांमधील व्यक्तिमत्व विकासाला चालना देण्यासाठी हे पाच दिवसीय शिबिर असल्याचे ते म्हणाले.

या शिबिरात विद्यार्थ्यांना विज्ञाननिष्ठ विचार, शारीरिक, बौद्धिक व मानसिक विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. बदलत्या युगाशी सुसंगत राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी विविध कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. नृत्य, खेळ, योग, ध्यान, वाचन, संवाद कौशल्य आदींचा शिबिरात समावेश करण्यात आल्याची माहिती शिबीराचे प्रमुख अनंत शिंदे यांनी दिली. या शिबिरात बजरंग जेडगुले, प्रा. नानासाहेब दिघे, वैभवी प्रेमलता संजय आढाव, प्रा. कोमल मस्के, धनश्री टाकळकर, दिपाली गायके, समाधान जाधव, तेजस पवार,अशा नामांकीत प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण दिले जात आहे.

प्रात्यक्षिकांसह ज्ञानार्जनाची विद्यार्थ्यांना संधी

संगमनेर तालुक्यातील 100 विद्यार्थ्यांना शिबिराद्वारे सहासी खेळ, योगा, छायाचित्रण, घोडेस्वारी, मातीकाम, रायफल शूटिंग, व्यायाम, स्काऊट गाईड, प्रथमोपचार, लेझीम, नृत्य, झांजरी, पथनाट्य, अंधश्रद्धा निर्मूलन, ट्रेकिंग, संगीत, संस्कार आणि अभिनय यांसारख्या विविध उपक्रमांचे प्रशिक्षण दिले जात आहे. दररोज सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांत सहभागी करून घेतले जाते

मानसिक, बौद्धिक विकासाला चालना

शिबिरात विद्यार्थ्यांना नवनवीन गोष्टी शिकायला मिळत असल्याने त्यांच्यात उत्साहाचे वातावरण आहे. राष्ट्रपुरुषांच्या जीवनावरील प्रेरणादायी व्याख्याने व देशभक्तिपर गीतांमुळे सहभागी विद्यार्थी आनंदाने शिबिराचा लाभ घेत असून, त्यांच्या शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकासाला चालना मिळत आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!