दंडकारण्य अभियानाची युनोस्कोत नोंद – आमदार थोरात

संगमनेर तालुक्यात पर्यावरण संवर्धनाचे महत्त्वाचे काम

प्रतिनिधी —

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या दंडकारण्य अभियानामुळे संगमनेर तालुक्यात वृक्षांची संख्या वाढली आहे. अत्यंत आदर्श आणि महत्त्वाचे पर्यावरण संवर्धनाचे काम संगमनेर तालुक्यात या अभियानामुळे होत असून या दंडकारण्य अभियानाची युनोस्कोने नोंद घेतली असल्याचे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी सांगितले  आहे.

एसएमबीटी सेवाभावी ट्रस्ट व कऱ्हे ग्रामस्थ व युवक काँग्रेस यांच्या वतीने कऱ्हे घाट परिसरात वृक्षारोपण प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी समवेत डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, तानाजी शिरतार, प्राचार्य डॉ. अशोक पाटील, डॉ. सुयोग तूपसाखरे, मुख्याध्यापक दशरथ वर्पे, मुख्याधिकारी श्रीराम कुऱ्हे, प्रा. बाबा खरात यांच्यासह युवक काँग्रेसचे नवीन सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार थोरात म्हणाले की, मोठ्या आनंदाने वाजत गाजत सायखिंडी येथील डोंगरावरूनच या अभियानाची सुरुवात केली. या अभियानामुळे उघडे बोडके डोंगर आता हिरवेगार दिसू लागले असून तालुक्यामध्ये झाडांची संख्या वाढली आहे. पर्यावरण संवर्धनाची अत्यंत आदर्श आणि महत्त्वाचे काम संगमनेर तालुक्यात होत असून या कामाची आंतरराष्ट्रीय पातळीवर युनोने सुद्धा दखल घेतली आहे.

यावर्षी अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांनी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेतला असून तालुक्यातील 11 डोंगरांवरती वृक्षारोपण होणार आहे. एसएमबीटी संस्थेच्या वतीने 1 लाख 51 हजार झाडे लावण्यात येणार असून आज क-हे घाट परिसरामध्ये 21000 वृक्षांचे रोपण करण्यात आले आहे. या वृक्षांचे संवर्धन व जपणूक अत्यंत महत्त्वाची आहे प्रत्येकाने या पर्यावरण चळवळीत सहभागी होताना जास्तीत जास्त वृक्षांचे संवर्धन करा असे आवाहनही त्यांनी केले.

डॉ.तांबे म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यात वृक्ष संवर्धन संस्कृती वाढली आहे. पर्यावरणाच्या या लोक चळवळीत विद्यार्थ्यांसह नागरिकांचा मोठा सहभाग राहिला असून गावोगावी मोकळ्या जागे यावर्षी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येत आहे या वृक्षांच्या संवर्धनाची जबाबदारी स्थानिकावर देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, नागरिकांबरोबर युवक व महिलांनीही या चळवळीमध्ये मोठा सक्रिय सहभागीत आपल्या घराच्या परिसरात वृक्षारोपण करून त्या वृक्षांचे संगोपन करावे. डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या की, कोरोना संकटात सर्वांना ऑक्सिजनचे महत्त्व कळाले असून हे ऑक्सिजन निर्मिती करणारे वृक्ष आपण जपले पाहिजे यावेळी एसएमबीटी डेंटल कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!