माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांना साने गुरुजी जीवनगौरव पुरस्कार जाहीर
संगमनेर प्रतिनिधी —
पुरोगामी विचारांचे पाईक, जयहिंद लोक चळवळीचे संस्थापक तथा नाशिक पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांना राष्ट्रसेवा दलाच्या वतीने दिला जाणारा साने गुरुजी जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
डॉ. तांबे हे संगमनेर मधील एम एस (सर्जन) असून वैद्यकीय क्षेत्राबरोबर संगमनेरच्या नगराध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी नगरपालिकेला दिशा दिली. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श विचारांवर लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संगमनेरच्या सहकार, समाजकारण, राजकारण, शिक्षण, क्षेत्रामध्ये योगदान दिले. निरोगी समाज निर्मितीसाठी जयहिंद युवा मंच ची स्थापना करून तरुणांना संघटित केले. पुरोगामी विचारांच्या प्रचारासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवले. मतिमंद व मूकबधिर विद्यालयांसाठी संग्राम मतिमंद विद्यालयाच्या माध्यमातून मोठे कार्य उभे केले.

सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या कामाची पावती देत जनतेने पदवीधरच्या निवडणुकीमध्ये सलग तीन वेळेस मोठ्या विक्रमी मताधिक्याने विजय मिळवून दिला. विधान परिषदेमध्ये शिक्षण, कृषी सहकार वकील, डॉक्टर, बेरोजगार पदवीधर युवकांसाठी सातत्याने विविध प्रश्न मांडले.
अहिल्यानगर नाशिक धुळे जळगाव नंदुरबार या पाच जिल्ह्यातील 54 तालुके विविध गावे यामध्ये सातत्याने त्यांनी संपर्क ठेवला. सहज उपलब्धता, सहज संपर्क आणि प्रत्येक प्रश्नांसाठी असलेला मोठा पाठपुरावा यातून मोठा जनसंपर्क निर्माण झाला. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी सुमारे नऊ लाख किलोमीटरचा प्रवास केला. नेता नवे मित्र अशी त्यांची महाराष्ट्रामध्ये मोठी ओळख निर्माण झाली आहे. आदिवासी, गोरगरीब बांधव यांच्याप्रती असलेली तळमळ, सातत्याने विज्ञानवादी विचारांचा ध्यास, साहित्य, समाजकारण, शिक्षण क्षेत्रात सततचे काम हे त्यांचे वैशिष्ट्य राहिले आहे.

राष्ट्रसेवा दलाच्या वतीने त्यांना अत्यंत मानाचा साने गुरुजी जीवनगौरव पुरस्कार 4 जून 2026 रोजी पुणे येथील कार्यक्रमात दिला जाणार आहे.
माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे, ॲड. माधवराव कानवडे, रणजीतसिंह देशमुख, दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्री थोरात, इंद्रजीत थोरात, सुधाकर जोशी, शंकरराव खेमनर, बाजीराव खेमनर, संपतराव डोंगरे, हौशीराम सोनवणे, रामहरी कातोरे, राजेंद्र कडलग, राजेंद्र गुंजाळ, विश्वास मुर्तडक, अजय फटांगरे, सोमेश्वर दिवटे, दिलीपराव पुंड, नूर मोहम्मद शेख, हिरालाल पगडाल, सुरेश झावरे यांच्यासह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
