आदिवासी गौरव दिनानिमित्त संगमनेरात भव्य रॅली व मेळावा उत्साहात पार पडला !
प्रतिनिधी —
पारंपारिक वेशभूषा, पारंपारिक नृत्य आणि घोषणांच्या निनादात हजारो आदिवासी बंधू-भगिनींची भव्य जनजागृती मेळावा व रॅली संगमनेरात संपन्न झाली असून आमदार बाळासाहेब थोरात यांनी आदिवासींच्या विकासासाठी सातत्याने काम केले असल्याचे प्रतिपादन माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले आहे.

मालपाणी लॉन्स येथे आदिवासी समाजाचा जनजागृती मेळावा प्रसंगी कार्यक्रमात डॉ. तांबे बोलत होते. यावेळी दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्री थोरात, आदिवासी सेवक प्रा.बाबा खरात, काशिनाथ गोंदे, नामदेव पारधी, हिरालाल पगडाल, शांताबाई खैरे, स्वाती मोरे, दशरथ गायकवाड, सुधाकर जोशी, संतोष हासे, दशरथ वर्पे, श्रीराम कुऱ्हे, वैशाली साबळे आदी उपस्थित होते. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा- बस स्थानक ते यशोधन कार्यालय दरम्यान झालेल्या रॅलीमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा करून आदिवासी नृत्य सादर केली.

डॉ. तांबे म्हणाले की, आदिवासींच्या विकासासाठी वाडी वस्तीवर सातत्याने विकासाच्या योजना राबवल्या आहेत. भारतीय राज्यघटना ही गोरगरीब आणि आदिवासींची कवच कुंडली आहे. मात्र काही लोक जाती-धर्माच्या नावावर राजकारण करून भेद निर्माण करू पाहत आहेत. मणिपूरमध्ये आदिवासी महिलांवर झालेला अत्याचार हा देशाला कलंक असून लोकशाही व राज्यघटना वाचवण्यासाठी सर्वांनी एक झाले पाहिजे.

दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, आदिवासी म्हणजे रानपाखरू आहेत. पाने, फुले व निसर्गाशी त्यांचे जवळचे नाते आहे. शेतीचा शोध हा आदिवासी महिलेने लावला असून मणिपुर मध्ये झालेल्या आदिवासी महिलांवरील अत्याचारा मुळे मणिपूर सरकार बरखास्त करून पंतप्रधानांनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे.

डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या की, आदिवासींच्या विविध प्रश्नांसाठी आमदार थोरात सातत्याने पाठपुरावा करत असून विधानसभेत ही त्यांनी आवाज उठवला आहे. आदिवासींच्या विकासाकरता जयहिंद कोळवाडे आश्रम शाळेची सुरुवात करण्यासह आदिवासी बांधवांसाठी एसएमबीटी हॉस्पिटल सुरू केले आहे. आदिवासी हा कष्टकरी समाज असून प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. मुलींचे शिक्षण करावे व्यसनापासून दूर राहावे असे आवाहन ही त्यांनी केले.

प्रा. बाबा खरात म्हणाले की, आदिवासी समाज हा सहनशील असून तो तितकाच स्वाभिमानी व कडक आहे. शिक्षण हा आदिवासींच्या प्रगतीचा मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी हिरालाल पगडाल, दशरथ गायकवाड, बाळकृष्ण गांडाळ, दिलीप बांबळे यांनीही मनोगते व्यक्त केली..

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदिवासी सेवक बाबा खरात यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. तर मुख्याध्यापक दशरथ वर्पे यांनी आभार मानले.
स्वातंत्र्यलढ्यात आदिवासींचे मोठे योगदान – आमदार थोरात
आदिवासी संस्कृतीला मोठी परंपरा असून हा समाज प्रामाणिक व कष्टाळू आहे भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आदिवासी समाजाचे मोठे योगदान असून या आदिवासी बांधवांनी शिक्षणातून समाजाची प्रगती साधावी असे आवाहन दूरध्वनी द्वारे करून सर्वांना आदिवासी गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

