बिरसा ब्रिगेड ही कोणत्याही धर्म, पंथ वा संप्रदायाविरोधी नाही, तर फक्त आदिवासी संस्कृतिची पुरस्कर्ती आहे.
राजकीय आरोप चुकीचे —काशिनाथ कोरडे
प्रतिनिधी –
अकोले तालुक्यात वारंवार बदनामी करण्याचे प्रयत्न चालू आहेत. त्यामुळे समाजात संभ्रम निर्माण करुन बिरसा ब्रिगेड ची भूमिका चुकीची असल्याचे भासवले जात आहे. राजकारणासाठी काही नेते मंडळी आरोप करत आहे ते चुकीचे असुन बिरसा ब्रिगेड ही कोणत्याही धर्म पंथ वा संप्रदायाविरोधी नाही. बिरसा ब्रिगेड फक्त आदिवासी संस्कृतिची पुरस्कर्ती असल्याची भुमिका बिरसा ब्रिगेडचे सह्याद्री विभाग अध्यक्ष काशिनाथ कोरडे यांनी स्पष्ट केली आहे.
बिरसा ब्रिगेड या संघटनेची भूमिका मांडण्यासाठी अकोले तालुका बिरसा ब्रिगेडच्या वतिने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी काशिनाथ कोरडे बोलत होते. बिरसा ब्रिगेडचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष भरत तळपाडे, कार्याध्यक्ष दिपक देशमुख, तालुका प्रसिद्धी प्रमुख यशराज कचरे, रवीद्र तळपाडे, लक्ष्मण धांडे आदी उपस्थित होते.
कोरडे म्हणाले कि, बिरसा ब्रिगेड ही ऐका नेतृत्वाखालील संघटना नसून आदिवासी समाजाचे सामाजिक संघटन आहे. सात राज्यात आदिवासी हितार्थ काम करत आहे. संविधानिक हक्क व आधिकारासाठी लढत आहे.
जल, जंगल, जमीन बरोबरच संस्कृती, अस्मिता, हक्क आधिकार, क्रांतीवीराचा इतिहास यावर जनजागृतीच्या माध्यमातुन हा लढा उभा केला आहे.
आदीवासी हिंदू नाही,मुस्लिम नाही,ख्रिश्चन नाही, बौद्ध नाही, जैन नाही,पारशी नाही,परंतु आदिवासींना सर्व धर्मात ओढण्याचे काम चालू आहे.
आमच्याविरुद्ध जो युक्तिवाद केला जात आहे की, महादेवाला बिरसा ब्रिगेड देव मानत नाही. मात्र तसे नाही. सर्वांनी समजून घेतले पाहिजे की, आदिवासींची देव, दैवते ही निसर्गाशी निगडीत आहेत. म्हणजे आम्ही निसर्गाला पूजतो ते आमचे देव आहेत. म्हणजेच वरसुबाई म्हणजे वरसाचे झाड़,, कळमज़ाई म्हणजे कळंबाचे झाड़, घोरपडाई म्हणजे घोरपड प्राणी, वाघोबा म्हणजे वाघ प्राणी, सालोबा म्हणजे सालाचे झाड़, उंबऱ्या म्हणजे उंबराचे झाड़, बहिरोबा, ढाकोबा, दुर्गुबाई, कळसुबाई इ. निसर्गातील ज्या शक्ति आहेत त्यांना देव मानतो. हे आमच्या देव्हाऱ्यातही आहेत. यात एक इर म्हणूनही आहे. याचा अर्थ आमच्या घराण्यातील किंवा कुळातील जो पूर्वज असतो त्याला देव मानले जाते व तो घरातील देव्हाऱ्यात असतो. तसाच आमचा महादेव हा आमच्या कूळीचा मूळपुरुष म्हणून ओळखला जातो. तो आमचा देव आहे असे आमचे पूर्वजही सांगत आलेत. परंतु काही मंडळी बिरसा ब्रिगेड बाबत संभ्रम निर्माण करत आहेत. तसेच वारकरी म्हणजे भागवत धर्मास आमचा अजिबात विरोध नाही. कोठेही विरोध केला नाही एखाद्या अखंड हरिनाम सप्ताहास विरोध केला आहे असे उदाहरण दाखवून द्यावे.
उलटपक्षी बहुजन समाजासाठी पुरोगामी विचारांच्या चळवळीस आमचा कायम पाठिंबा असणार आहे. आमचा शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांनी चालणाऱ्या म्हणजे संभाजी ब्रिगेड, आंबेडकरवादी सारख्या संघटनांसोबत कायम अग्रस्थानी असतो.
मात्र भागवत धर्म असो वा कोणताही पंथ संप्रदाय ही आदिवासी संस्कृति नाही तर आदीवासी संस्कृतीमधून तुकाराम महाराजांनी जे तत्वज्ञान समाजाच्या उद्धारासाठी
भागवत धर्मातुन मांडले आहे. मनुस्मृतीच्या कर्मकांडाच्या वर्णव्यवस्थेतुन बहुजन समाजाला बाहेर काढणारे नामदेव महाराजांचा भागवत धर्म हा बहुजन समाजासाठी अत्यंत चांगला आहे. त्यास आमचा विरोध नाही.
मात्र तो धर्म वा कोणताही पंथाचा आणि आदिवासी संस्कृतीचा काहीही संबंध नाही. आम्ही हिंदू धर्माच्या वर्णव्यवस्थेत मोडत नाही. त्यामुळे त्यावेळच्या कर्मकांड वा जातिभेदाचा आमचा सबंध नाही.
कारण सुप्रीम कोर्टाच्याही पीटिशन क्र.10367च्या 5 जानेवारी 2011 च्या निर्णयानुसार आदिवासी हिंदू नाहीत. तसेच 1955 च्या हिंदू मैरेज एक्ट चा व आमचा काहीही सबंध नाही. तसेच 1871 पासून 1941 पर्यंतच्या दर दहा वर्षांनी होणाऱ्या जनगणनेत आदिवासी म्हणूनच नोंद करण्यात आली आहे. मात्र आता हिंदूकरण करण्याचा काही संघट्ना व पक्षांकडून करण्याचा प्रयत्न असतो त्यांचाच हा भाग असून आमचे आदीवासी पुढारी ही तीच भाषा बोलू लागले आहेत.
तसेच राज्यघटनेच्या अनुच्छेद 244 अंतर्गत आदिवासी क्षेत्र असून येथे कोणत्याही धर्माचा प्रचार प्रसार करता येत नाही. मात्र हे राजरोसपणे चालू आहे. यावर कोणी बोलत नाही. आम्ही आदीवासी संस्कृति जतन करण्यास सांगितले तर चूकीचा संभ्रम जाणीवपूर्वक पसरवला जातो.
झारखंड हायकोर्टाच्या wp pil 6884/2002 निर्णयाने स्पष्ट केले आहे की, जरी इतर धर्म स्विकारला असला तरी जे आदिवासींचे आरक्षण आहे ते त्यांनी संस्कृती, भाषा, परंपरा टिकवून ठेवली आहे. त्यामुळे आरक्षण अबाधित आहे.
त्याच प्रमाणे 2017 साली झालेल्या आदिवासी संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्याकडून झालेल्या सर्वे वेळी आदिवासींचे देव दैवते व चालिरिती विचारल्या जात होत्या. आजही जात पडताळणी साठी आदिवासींचे देव दैवते कुळसाया विचारल्या जातात. तिथे ही राजकीय मंडळी वाघोबा, वरसुबाई, कळसुबाई, बहिरोबा सोडून इतर देव देवताचे नाव लिहायला सांगणार आहेत का ?
बिरसा ब्रिगेड कोणत्याही पक्षास बांधील नाही…!
आदिवासी हिंदू नाहीत. आदिवासी संस्कृती जतन करा. असे आदिवासींना पूर्वी सांगणारे आदिवासी नेते पक्ष बदलून गेल्यावर राजकीय अजेंड्याप्रमाणे स्वताच्या फ़ायद्यासाठी आदिवासींना हिंदू धर्माचे ठरवू लागले आहेत व सोईस्कर भूमिका घेतली जात आहे.. राजकीय फायदा पाहिला जातो. बिरसा ब्रिगेड कोणत्याही पक्षास बांधील नाही. किंवा कोणीही गृहीत धरु नये. आदिवासी समाजाची बिरसा ब्रिगेड संघटना आहे. ही संघटना समाज म्हणूनच राहणार असल्याचा दावाही काशिनाथ कोरडे यांनी केला.
