निळवंडे साठी तुमचे योगदान काय — आमदार थोरात

समन्यायी पाणी वाटपाच्या वेळी विधानसभेत गप्प बसले होते…

महसूल मंत्री विखे पाटील यांचे नाव न घेता विविध आरोपांची घेतली झाडाझडती !

प्रतिनिधी —

तालुक्यातील जनतेचे प्रेम आणि नेतृत्वाचा विश्वास यामुळे राज्य पातळीवर सातत्याने मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळाली. या संधीतून अविश्रांतपणे व प्रामाणिकपणे जनतेच्या विकासाची कामे केली. निळवंडे धरण व कालव्यासाठी अविरतपणे प्रयत्न केल्यानेच कालव्यांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. आता निळवंडे चे पाणी कोणीही थांबू शकणार नाही. निळवंडे साठी ज्यांनी मदत केली आम्ही त्यांचा कायम उल्लेख करतो मात्र तुमचे निळवंडे साठी योगदान काय असा सवाल काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी नाव न घेता महसूल मंत्री विखे पाटील यांना विचारला असून समन्यायी पाणी वाटपाविरोधात संगमनेर व अकोले संघर्ष करत असताना तुम्ही या संघर्षात सहभाग न घेता का गप्प होता? असा परखड सवाल ही त्यांनी उपस्थित केला. संगमनेर तालुका दबावाच्या राजकारणाला बळी पडणार नाही असेही आमदार थोरात यांनी म्हटले आहे.

तळेगाव दिघे येथे २५ कोटीं रुपये निधीच्या विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी आमदार डॉ. सुधीर तांबे हे होते तर व्यासपीठावर दुर्गा तांबे, डॉ. जयश्री थोरात, बाबा ओहोळ, जि. प. सदस्य महेंद्र गोडगे, मिलिंद कानवडे, शंकरराव खेमनर, बेबी थोरात, अमित पंडित, रामहरी कातोरे, अजय फटांगरे ,सरपंच बाबासाहेब कांदळकर, शेतकी संघाचे संचालक सचिन दिघे, हौशीराम सोनवणे, अविनाश सोनवणे, सुभाष सांगळे, भारत मुंगसे, संपतराव डोंगरे आदी उपस्थित होते. या प्रसंगी भव्यदिव्य व अद्यावत अशा ग्रामीण रुग्णालय आणि सेवा सोसायटीच्या इमारतीचे लोकार्पणही करण्यात आले.

यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, आपण कायम प्रामाणिक व मेहनतीने काम केले आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्याच्या राजकारणाचा राज्यात लौकिक आहे. तालुक्याचे क्षेत्रफळ मोठे असून १७१ गावे व २४० वाड्यांवर विकासाच्या योजना राबवल्या आहेत.

१९९९ ला मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर निळवंडे धरणाच्या कामाला गती दिली. अनेक अडचणी आल्या परंतु यामध्ये माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी मोलाचे सहकार्य केले. आज श्रेय घेऊ पाहणाऱ्यांचे यामध्ये कोणतेही योगदान नाही. पुनर्वशींतांना सहकारी संस्थांमध्ये चांगल्या पदावर नोकऱ्या दिल्या.

२०१४ ते १९ च्या काळात कामे अगदी मंदावली होती. ईश्वराच्या आशीर्वादाने पुन्हा सत्ता मिळाली आणि कालव्यांच्या कामाला खरी गती आली. हजारो कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. ही कामे अंतिम टप्प्यात आहेर. खरे तर या दिवाळीला पाणी या शिवारात आणायचे होते. परंतु सत्ता बदल झाला आणि कामे थंडावली. ही कामे अंतिम टप्प्यात आहे.आता आपले पाणी कोणीही अडवू शकणार नाही.

आज मी मी म्हणणारे यांची या कामात कोणतीही मदत नाही. माजी मंत्री पिचड यांनी मदत केली त्यांचा नाम उल्लेख आपण कायम करतो. याचबरोबर समन्यायी पाणी वाटपाबाबत सातत्याने विष पेरण्याचे काम काही मंडळी करत आहेत. ज्यावेळी अकोले संगमनेर मध्ये समन्यायी पाणी वाटपाविरोधात आंदोलन केले, आम्ही संघर्ष करत होते. त्यावेळेस या मंडळींनी त्यामध्ये सहभाग घेतला नाही. त्यावेळेस ते गप्प होते. तुम्हीही विधानसभेत होता त्यावर का बोलले नाही. असा सवाल करताना सत्ता येते आणि जाते. त्यामुळे दबावाचे राजकारण करू नका.

संगमनेर तालुका दबावाला बळी पडणार नाही ! 

संघर्ष हा संगमनेरकरांच्या नसा नसात भिनलेला आहे. स्वातंत्र्यलढ्यातील संग्रामासह पाण्यासाठी मोठा संघर्ष आम्ही केला आहे. दबावाचे व खोट्या केसेस दाखल करण्याचे राजकारण संगमनेरकर कधीही खपवून घेणार नसून “सौ शहरी एक संगमनेरी” असलेला हा तालुका दबावाच्या राजकारणाला बळी पडणार नाही असेही आमदार थोरात यांनी म्हटले आहे..

आपल्याला पद मिळाले त्याप्रमाणे वागा. पदाची किंमत तरी ठेवा. निळवंडे कालव्यासह मागील वर्षी कोरोना संकटातही पाणीपुरवठा योजनेसाठी ८८३ कोटी रुपयांचा निधी मिळवला. विविध रस्ते व विकास कामांसाठी निधी मिळवला. मात्र नवीन सरकार आले आणि सर्व कामांना स्टे दिला. हे सरकार स्थगिती सरकार आहे. परंतु लवकरच बदल होणार आहे. देशात बदलाचे वारे निर्माण झाले आहे. खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

आपल्या तालुक्यात काही खबरे निर्माण झाले असून या खाबऱ्यांचा आता जनता नक्की बंदोबस्त करेल असेही त्यांनी म्हटले आहे.

उद्घाटनांची लईच घाई असेल तर आधी नगर मनमाड रस्ता दुरुस्त करा..

संगमनेर बस स्थानक ते इंजिनिअरिंग कॉलेज रस्ता करतात नितीन गडकरी व आपल्या संबंधातून केंद्राकडून २५ कोटी रुपये मिळाले व राज्य सरकारचे २५ कोटी यातून हे काम सुरू आहे. मात्र काही मंडळींनी उद्घाटनाची घाई केली उद्घाटने करायची असतील तर पहिला नगर मनमाड रस्ता दुरुस्त करा. गचक्यांचा रस्ता म्हणून महाराष्ट्रात कुप्रसिद्ध असल्याने रस्त्याकडे पहा. आम्ही कधीही वाईट राजकारण केले नाही, कुणाच्या अन्नात माती कालवली नाही. किंवा कुणाबद्दल वाईटही चिंतले नाही. मात्र सध्याचे सुरू असले द्वेष भावनेचे राजकारण जनता पाहत आहेत. हे विसरू नका.

आमदार डॉ. तांबे म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात हजारो कोटींची विकास कामे झाली आहेत. निळवंडे धरण पूर्ण करून या कालव्यासाठी आमदार थोरात यांनी आपले पद पणाला लावले आहे. तालुक्याचा विकास वेगाने होतो आहे. येत्या दोन-तीन महिन्यात आमदार थोरात यांच्या माध्यमातून या भागात पाणी येऊ शकते. सध्याचे सरकारी भांडवलदारांसाठी असून लोकशाही व तालुक्याचा विकास टिकवण्यासाठी सर्वांनी आमदार थोरात यांच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले.

तर महेंद्र गोडगे म्हणाले की, आमदार थोरात यांनी तळेगाव गटासह तालुक्यात खूप कामे केली. मात्र आपल्यातील मतभेदासाठी काही लोक तालुक्याच्या विकासात खोडा निर्माण करतात.आपल्यातील गटा तटाचा फायदा खबरे आणि इतर लोक घेत असतात. विकासासाठी सर्वांनी एकत्र असे आव्हान त्यांनी केले. यावेळी डॉ. जयश्री थोरात, मिलिंद कानवडे, रमेश दिघे यांनीही मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच बाबासाहेब कांदळकर यांनी केले. सूत्रसंचालन सचिन दिघे यांनी केले तर रमेश दिघे यांनी आभार मानले.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!