वीज वितरणच्या ढिसाळ कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा भर उन्हात रास्ता रोको….
धांदरफळ खुर्द वीज सबस्टेशनवर संतप्त शेतकऱ्यांचा मोर्चा !
संगमनेर प्रतिनिधी —
सध्या उन्हाची तीव्रता प्रचंड प्रमाणात वाढली आहे. अशा काळामध्ये पूर्ण दाबाने वीजपुरवठा होणे गरजेचे आहे. मात्र वीज वितरणच्या ढिसाळ कारभारामुळे वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत व्हावा, याचबरोबर नदीच्या आवर्तन काळामध्ये 11 तास वीज मिळावी अशा आग्रही मागणीसाठी पंचक्रोशीतील संतप्त शेतकऱ्यांनी भर उन्हामध्ये रस्ता रोको केला तर वीज वितरण कार्यालयावर मोर्चा नेऊन आपल्या मागण्यांसाठी घोषणाबाजी केली.

धांदरफळ खुर्द येथील वीज वितरण विभागाच्या कार्यालयावर शेतकऱ्यांनी आक्रमकपणे मोर्चा काढला. यावेळी धांदरफळ खुर्द येथे शेतकऱ्यांनी भर उन्हामध्ये रस्ता रोको केला. यामध्ये कारखान्याचे व्हा.चेअरमन पांडुरंग पाटील घुले, ॲड. माधवराव कानवडे, संपतराव डोंगरे, दत्ता कोकणे, शरद कोकणे, मारुती कवडे, सतीश खताळ, शुभम घुले, संगम आहेर, शांताराम गोरडे, देविदास खताळ, सुरेश कातोरे, अण्णा पाटील खताळ, भाऊराव शिरतार, अविनाश खताळ, किशोर खताळ, राजेंद्र बोडके, लताताई खताळ, नवनाथ कातोरे, अरुण गुंजाळ, राहुल कवडे, ज्ञानेश्वर गोरडे, संदीप ठोंबरे, बाळासाहेब खताळ, सोमनाथ शिंदे, अमोल शिंदे, सचिन खताळ, बाळासाहेब गुंजाळ, मंगेश मतकर, वैभव डोंगरे, संतोष कोकणे, नितीन डोंगरे, प्रभू खताळ, त्रिंबक खताळ, देवराम गुंजाळ, भाऊसाहेब शिरतार यांच्यासह धांदरफळ बुद्रुक, धांदरफळ खुर्द ,सांगवी, नांदुरी दुमाला, निमज, मिर्झापूर यांसह विविध गावांमधील शेतकरी उपस्थित होते.

सध्या सर्वत्र उन्हाची तीव्रता वाढत असून शेतीसाठी पाणी व पशुधनासाठी पाणी मिळण्याकरता वीज पुरवठा सुरळीत झाला पाहिजे. मात्र वीज वितरण विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे वीज वेळोवेळी खंडित होत आहे. याचबरोबर अत्यंत अपूर्ण दाबाने वीज मिळत आहे. यापूर्वी अशी परिस्थिती कधीही नव्हती. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकाळामध्ये शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने पूर्णवेळ वीज मिळावी होती. मात्र आता सर्वत्र ढिसाळ कारभार सुरू असल्याचा नमुना शेतकऱ्यांना पाहायला मिळत असून यामुळे सर्व धांदरफळ परिसरातील विविध गावांमध्ये शेतकरी चांगलेच आक्रमक झाले.

वीज पुरवठा सुरळीत करण्याबरोबर लवादाच्या निर्णयानुसार रोटेशनच्या कालावधीमध्ये 11 तास वीज मिळावी यासाठी सुमारे चार तास भर उन्हामध्ये रास्ता रोको केला. अकरा तास वीज मिळाली नाही तर गुराढोरांसह मोठे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला.
निवेदनात शेतकऱ्यांनी म्हटले आहे की, वीज पुरवठा सुरळीत व्हावा. याचबरोबर 11 तास लाईट मिळावी, जुने जीर्ण झालेले पोल आणि विद्युत तार यांचे चांगले व्यवस्थापन करावे. नदीच्या कडेला बंद असलेल्या डीपी सुरळीत सुरू कराव्या. अकोले वरून येणारी 33 के व्ही धांदरफळ फिडरचा विद्युत पुरवठा कमी दाबाने होतो तो सुरळीत करावा. शेतीसाठी कमी दाबाने पुरवठा झाला तर तो भरून काढावा अशा विविध मागण्या शेतकऱ्यांनी यावेळी केल्या.

या मागण्या करताना विविध गावांमधील शेतकरी अत्यंत संतप्त झाले होते. यावेळी शुभम घुले, संगम आहेर, शांताराम गोरडे, देविदास खताळ, सुरेश कातोरे, अण्णा पाटील खताळ, भाऊराव शिरतार, अविनाश खताळ, किशोर खताळ, राजेंद्र बोडके, पांडुरंग पा घुले, दत्ता कोकणे, संपतराव डोंगरे अरुण गुंजाळ, शरद कोकणे यांसह विविध शेतकऱ्यांनी अत्यंत संतप्त भावना व्यक्त केल्या.
यानंतर वीज विभागाचे उपकार्यकारी अभियंता चव्हाण, मेखे व शिलावंत यांनी सर्व शेतकऱ्यांची संवाद साधत वीज सुरळीत करण्यात येईल याचबरोबर एक-दोन दिवसांमध्ये रोटेशन काळामध्ये 11 तास लाईट देण्याबाबत सर्व शेतकऱ्यांना कळविण्यात येईल असे आश्वासन दिले. त्यानंतर हे आंदोलन स्थगित झाले.
