सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याची जय्यत तयारी!
मालपाणी उद्योग समूहाचा उपक्रम; बुधवारी 35 जोडप्यांचे शुभमंगल
संगमनेर, प्रतिनिधी दि. 28
येथील मालपाणी उद्योग समूहाच्यावतीने सामुदायीक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अक्षय्यतृतीयेच्या दिनी येत्या बुधवारी (ता.30) होत असलेल्या या सोहळ्यात 35 वधु-वर परिणयाच्या धाग्यात गुंफले जाणार आहेत. या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली असून दोन्ही पक्षांकडून उपस्थित राहणार्या पाहुणे मंडळींची भोजन व्यवस्था, वधु-वरांसाठी स्वतंत्र कक्ष, पाहुणे मंडळींच्या भेटीगाठी, विवाहासाठीचा मांडव अशा सर्व छोट्या-मोठ्या गोष्टींचे नेटके नियोजन करण्यात आले आहे. सामाजिक दायीत्वाच्या भावनेतून उद्योग समूहाच्यावतीने गेल्या 28 वर्षांपासून या सोहळ्याचे आयोजन केले जाते. बुधवारी होणार्या या सोहळ्याला संगमनेरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नवदाम्पत्यांना आशीर्वाद द्यावेत असे आवाहन मनीष मालपाणी यांनी केले आहे.
अवघ्या एक रुपया नोंदणी फिमधे प्रतिवर्षी अशा सोहळ्याचे आयोजन केले जाते. मालपाणी उद्योग समूहाच्यावतीने 1997 पासून हा सोहळा आयोजित केला जात आहे. यंदा त्याला चांगला प्रतिसाद देत संगमनेर तालुक्यातील हिंदू व बौद्ध धर्मिय 35 वधु-वरांनी या विवाह सोहळ्यासाठी नावे नोंदणी केली आहे. कॉलेज रस्त्यावरील मालपाणी लॉन्स येथे हा सोहळा होणार आहे. वधु-वरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी राज्याचे जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार सत्यजीत तांबे व अमोल खताळ, माजीमंत्री बाळासाहेब थोरात, माजी खासदार डॉ.सुजय विखे-पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या सोहळ्यासाठी मालपाणी लॉन्स्चा संपूर्ण परिसर सुशोभित करण्यात आला आहे. आकर्षक स्वागत कमानी, येणार्या पाहुणे मंडळींना वधु-वरांची व त्यांच्या कक्षाची, तसेच विविध कार्यक्रमांची माहिती मिळावी यासाठी स्वागत व चौकशी कक्ष, पाहुण्यांचे उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी विवाह सोहळ्याच्या संपूर्ण परिसरात मांडव, शीतल हवेसाठी विशेष वातानुकुलीत व्यवस्था, एकाचवेळी हजारों पाहुण्यांची भोजन व्यवस्था, वर मिरवणूकीसाठी सजवलेली वाहने, या शिवाय दुपारच्या सत्रात पाहुण्यांच्या मनोरंजनासाठी खास सदाबहार गाण्यांची मैफिलही आयोजित करण्यात आली आहे.
दुपारी साडेचार वाजता प्रत्यक्ष विवाह सोहळ्यास सुरुवात होईल. हा विवाह सोहळा अतिशय देखणा, आकर्षक आणि परिपूर्ण व्हावा यासाठी विविध कार्य समित्या कार्यरत आहेत. या सामुदायीक विवाह सोहळ्यात विवाहबद्ध होणार्या नवदाम्पत्यांना मालपाणी उद्योग समूहाच्यावतीने सुमारे 25 हजार रुपयांच्या संसारोपयोगी वस्तु भेट म्हणून देण्यात येणार आहेत. हा आकर्षक सोहळा पाहण्यासाठी व वधु-वरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी संगमनेरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मालपाणी उद्योग समूहाच्यावतीने करण्यात आले आहे.