सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वावर काम केल्याने कारखान्यावर सभासद व जनतेचा मोठा विश्वास – माजीमंत्री बाळासाहेब थोरात

निवडणूक काळात समाजात द्वेष भावना पसरवली जाते — डॉ. तांबे यांची खंत

मेळाव्यातून सभासद सोबत स्नेहसंवाद

संगमनेर प्रतिनिधी दि. 23

राजकारण हे नेहमी समाजाच्या विकासासाठी करायचे असते. हे तत्व घेऊन आपण सर्वांना सोबत घेऊन सातत्याने काम केले. संगमनेर तालुक्यातील समृद्धी, झालेली विकास कामे, निळवंडे धरण, कालव्यांची कामे यामागे सततचे कष्ट आहे. त्यातून हे उभे राहिले आहे. सहकाराबरोबर तालुक्यातील विकास कायम ठेवायचा असून चांगल्या कारभारामुळे थोरात कारखान्यावर सभासद शेतकरी व तालुक्यातील जनतेचा मोठा विश्वास असल्याचे गौरवोद्गार माजी महसूलमंत्री तथा काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे.

गुंजाळवाडी येथील कृष्णा लॉन्स व समनापुर येथे झालेल्या कारखाना सभासद शेतकरी व युवकांच्या स्नेहसंवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, लहान भाऊ गुंजाळ, आर.बी.राहणे, इंद्रजीत थोरात, बाळासाहेब ढोले, सिताराम राऊत, लक्ष्मणराव कुटे, संतोष हासे, संपतराव गोडगे, रामनाथ कुटे, योगेश भालेराव, लताताई गायकर, निर्मलाताई गुंजाळ, अंकुश ताजणे, सरपंच नरेंद्र गुंजाळ, रामनाथ कुऱ्हे, भास्कर शरमाळे आदी उपस्थित होते.

थोरात म्हणाले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वावर संगमनेरचा सहकार व कारखान्याचा कारभार सुरू आहे. चांगला कारभार व व्यवस्थापनामुळे सर्व शेतकरी सभासद व जनतेचा कारखान्यावर मोठा विश्वास आहे.

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कारखान्याच्या निवडणुकीबाबत मोठी चर्चा होती. मात्र तालुक्यातील जनतेच्या सभासदांचा शेतकरी विकास मंडळावर मोठा विश्वास होता. मोठ्या मताधिक्याने नक्कीच विजय होता.सहकार जपला पाहिजे ही सर्वांची भावना होती. आपण कायम तालुक्याच्या विकासासाठी काम केले. कधीही भेदभाव केला नाही. मोठ्या संघर्षातून तालुक्याला हक्काचे पाणी मिळवले. सातत्याने विकास कामे केली.

निळवंडे धरण व कालव्यांची कामे पूर्ण केली. आज कालव्यांमधून पाणी येते आहे. यामध्ये कष्ट आहेत. जेथे टँकर होते तेथे आज पाणी आहे. कोणतेही काम सहजासहजी होत नाही.  सर्वांना सोबत घेऊन राजकारणाची पद्धत, सुसंस्कृत राजकारण ही आपली वेगळी परंपरा आहे. आपण कामात कुठेही कमी नाही. आणि त्यामुळे विधानसभा निवडणुकीचा निकाल हा सर्वांना अविश्वसनीय आहे.

मोठ्या संघर्षातून तालुक्याला पाणी मिळवले आहे. आता संगमनेर तालुक्याला कालव्यांमधून हक्काचे पाणी देण्यासाठी पहिले पाईप टाकले पाहिजे आणि त्यानंतर काँक्रिटीकरण झाले पाहिजे अशी मागणी करताना कालव्याच्या खालील बाजूस व वरच्या बाजूस पाणी देण्याची आपण नियोजन केले होते. हे पाणी मिळालेच पाहिजे.

सहकारी संस्था या सर्वांच्या जिवाभावाचा विषय आहे. येथे अनेक जण इच्छुक होते परंतु अनेकांनी माघार घेतल्याने संचालक मंडळ बिनविरोध होतो याचा आनंद आहे. मात्र पुढील काळात एकरी ऊस उत्पादन वाढीसाठी काम करावे लागणार आहे. यामध्ये ए आयचा वापर करावा लागणार असल्याचे ते म्हणाले.

तर डॉ.तांबे म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वावर तालुक्यातील जनतेचा कायम विश्वास आहे. संगमनेरचा सहकार हा राज्यात प्रथम क्रमांकाचा आहे. सहकार ही राजकारणाचे ठिकाण नाही. सहकाराचे पावित्र्य सर्वांनी जपले पाहिजे. सध्या निवडणुकांमध्ये द्वेष भावना पसरवली जात आहे. चुकीच्या पद्धतीचा वापर केला जात आहे. यामुळे देशाचे भवितव्य अंधकारमय झाले असून आगामी सर्व निवडणुका कार्यकर्त्यांनी एकजुटीने लढवताना सर्वसामान्य जनतेपर्यंत अधिक संपर्क वाढवा असे आवाहन केले. यावेळी तालुक्यातील शेतकरी सभासद युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

पहेलगाम येथील अतिरेकी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या भारतीयांना श्रद्धांजली

काश्मीर खोऱ्यातील पहेलगाम येथे अतिरेकी हल्ल्यात निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. या सर्व भारतीयांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याचबरोबर हा भ्याड हल्ला अत्यंत निंदनीय व माणुसकीला काळीमा फासणारा असल्याचे काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले असून या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!