संगमनेरच्या स्वातंत्र्याशी खेळाल तर याद राखा ; उद्रेक होईल
माजी मंत्री बाळासाहेब थोरात आक्रमक
व्यापक जनआंदोलन उभारण्याची घोषणा
संगमनेर दि. 30 प्रतिनिधी —
सत्तेचा वापर करून संगमनेर मोडण्याचे षडयंत्र काही मंडळी करत आहेत. आश्वी बुद्रुक अपर तहसील कार्यालय निर्मितीचा प्रस्ताव हा संगमनेर सोबत झालेला विश्वासघात आहे. संगमनेरच्या स्वातंत्र्याशी खेळाल तर याद राखा, असा सज्जड इशारा काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला. यावेळी त्यांनी भर सभेत तहसीलदार यांच्या सहीने जिल्हाधिकाऱ्यांना सादर झालेला अपर तहसील कार्यालय निर्मितीचा प्रस्तावच जनतेला दाखविला.

नव्याने आश्वी बुद्रुक येथे होणाऱ्या तहसील कार्यालयात समाविष्ट होणाऱ्या गावांच्या शिष्टमंडळाने कारखाना कार्यस्थळावर माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली यावेळी ते बोलत होती. याप्रसंगी रणजीतसिंह देशमुख, आर बी राहणे, लक्ष्मणराव कुटे यांच्यासह विविध गावांमधील पदाधिकारी कार्यकर्ते युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

थोरात म्हणाले की, महसूल प्रशासन हे जनतेच्या सोयीसाठी असते. तहसील निर्मितीला आमचा विरोध नाही, मात्र या तहसीलची निर्मिती करताना त्यामध्ये ज्या गावांचा समावेश करण्यात आलेला आहे, ती गावे संगमनेर शहराच्या लगत आहेत. संगमनेर खुर्द आणि बुद्रुक ह्या दोन गावांना आजवर प्रवरामाईने घट्ट पकडून ठेवले होते. पायी अंतरावर असलेले संगमनेरचे तहसील कार्यालय सोडून संगमनेर खुर्दच्या नागरिकांना तब्बल 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या आश्वीला पाठवण्या मागचा प्रशासनाचा हेतू काय?

अशी कितीतरी गावे आहेत ज्यांचा आश्र्वी बुद्रुक अपर तहसील मध्ये समावेश हा संशयास्पद आहे. नवीन तहसील कार्यालय त्यांच्यासाठी गैरसोयीचे आहे, यातून संगमनेरची भौगोलिक, सामाजिक आणि सांस्कृतिक रचना सुद्धा बिघडणार आहे. असे असताना कोणत्याही गावाला विश्वासात न घेता असा अप्पर तहसील निर्मितीचा प्रस्ताव बनतोच कसा? या पाठीमागे राजकीय डाव आहे, संगमनेरचे स्वातंत्र्य मोडीत काढण्याचा हा प्रयत्न आहे. एवढेच नाही तर संगमनेर शहराचे महत्व कमी करण्याची भूमिका देखील यामागे दिसते. संगमनेर तालुक्यासाठी ही अत्यंत चिंतेची बाब आहे, असेही थोरात म्हणाले.

स्वतंत्र तहसील निर्मिती हा संगमनेरला तोडण्याचा डाव आहे, त्यांच्या षडयंत्राची सुरुवात झाली आहे. यापुढे अशा अनेक संकटांना आपल्याला सामोरे जावे लागेल. मोठा संघर्ष करून संगमनेर साठी आणलेले पाणी वाचविण्याची लढाई पुढील काळात लढावी लागेल, अनेक शासकीय कार्यालयाचे विभाजन करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल, मात्र हे आम्ही सहन करणार नाही. संगमनेरच्या स्वातंत्र्यासोबत खेळण्याचा प्रयत्न केला तर याद राखा, अन्यथा मोठा उद्रेक होईल आणि तुम्हाला पळता भुई थोडी होईल. प्रशासनाने राजकीय दबावातून भूमिका घेऊ नये, आपण सदैव जनतेसोबत असले पाहिजे. प्रशासनाने राजकारणाचा भाग होता कामा नये, अशी अपेक्षाही बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.

प्रशासकीय पत्रच आणलं समोर..
आश्वी बुद्रुक येथे अपर तहसील कार्यालय निर्मितीचा प्रस्तावच नाही असा प्रचार काहींकडून सुरू होता त्याला उत्तर देताना भर सभेत बाळासाहेब थोरात यांनी तहसीलदार संगमनेर यांच्या सहीचे 24 तारखेचे पत्रच जनतेला दाखविले.
हे राजकारण कोणालाही पटणार नाही
संगमनेरच्या मोडतोडीचा प्रस्ताव संगमनेर मधील माझ्या राजकीय विरोधकांनाही पटणार नाही. राजकारणात कदाचित आमच्या भूमिका वेगवेगळ्या आपल्या तरीही या अन्यायाविरोधात संगमनेरकर एकत्रित लढा उभारतील.
तहसील निर्मितीचा प्रस्ताव हा खोडसाळपणा आहे, तो वस्तुस्थितीला धरून नाही, ही बाब मी सरकार आणि प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे, मुख्यमंत्री आणि महसूलमंत्री यांना पत्र देऊन जनभावना कळवणार असल्याचे माजी महसूल मंत्री थोरात यांनी म्हटले आहे.
