राज्यात युती सरकारकडून जातीपातीचे राजकारण — आमदार थोरात
खांबे येथे कामधेनू उपसा सिंचन योजना कामाचा शुभारंभ
प्रतिनिधी —
सध्याचे सरकार हे महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण करून मतं मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे. महाराष्ट्र अशा गोष्टींना थारा देत नाही. येणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

खांबे येथील कामधेनू उपसा सिंचन योजना कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी. युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात, मीरा शेटे, गणपतराव सांगळे, राजेंद्र चकोर, इंद्रजीत खेमनर, सचिन खेमनर, बाळासाहेब गायकवाड, विक्रम थोरात आदींसह नागरिक उपस्थित होते.

आमदार थोरात पुढे म्हणाले की, अनेक वर्षापासून खांबे गावचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या कामधेनू सिंचन योजनाचे आज आपण भूमिपूजन केले आहे. महाविकास आघाडी सत्तेवर असताना जलसंधारण विभागातून ह्या योजनेला मंजुरी मिळाली होती. परंतु खोके सरकार आल्यानंतर सदरच्या योजना थांबविण्यात आल्या. सतत पाठपुरावा करून आज भूमिपूजन सुद्धा करतो आहे. आमचे सरकार सत्तेवर असताना राज्यातील शेतकऱ्यांसाठी व जनतेसाठी अनेक चांगल्या योजना अंमलात आणण्याचे काम केले होते. मात्र महायुती सरकार मुळे सध्या राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. कोणत्याही ठोस योजना न करता फक्त मतांची पोळी माझ्याकरिता जातीपातीचे राजकारण व फोडाफोडीचे राजकारण करण्यापलीकडे या सरकारने अडीच वर्षात कोणतेही काम केले नाही.

काही नेते मंजूर झालेल्या योजनांना अडचणी निर्माण करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. परंतु येणाऱ्या काळात त्यांचा बंदोबस निश्चितपणे करू. चांगल्या कामासाठी आपण राजकारण करतो. लवकरच हे सरकार जाणार आहे आणि महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. याकरता कोणत्याही भूलथापांना बळी न पडता महाविकास आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे असेही आवाहन त्यांनी केले.

डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या की, ही योजना महाविकास आघाडीच्या काळात सर्व्हे करून मंजूर करून घेतली होती. परंतु खोके सरकार आल्यानंतर योजनेला अडचणीत आणण्याचे काम त्यांनी केले. आमदार थोरात यांनी मंत्रिपदाच्या काळात शेतकऱ्यांसाठी अनेक चांगले निर्णय घेतले होते. साहेबांना राज्याच्या जबाबदारी बरोबरच दिल्लीतही मोठे आदराचे स्थान असल्याने पक्षांमध्ये त्यांच्या शब्दाला वजन आहे. येणाऱ्या निवडणुकीत आपण आमदार थोरात यांना एक शब्द देऊ की साहेब तुम्ही महाराष्ट्र सांभाळा आम्ही गाव सांभाळतो. हा नारा देऊन सर्वांनी येणाऱ्या निवडणुकीत मोठ्या ताकतीने आमदार थोरात यांचे हात बळकट करण्यासाठी कटिबद्ध राहावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी माधव दातीर, अण्णासाहेब राहींज, दातीर गुरुजी, भिमाजी राहींज, जयराम ढेरंगे, तुकाराम दातीर, विलास दातीर, बाबासाहेब दातीर, प्रमोद बोंद्रे, बाबुराव लावरे आदींसह खांबे गावातील तसेच पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामदास जोरी यांनी केले. तर आभार विलास दातीर यांनी मानले.
