केंद्रातील भाजप सरकारचा घमेंड उतरवण्याचे काम महाराष्ट्राने केले — आमदार बाळासाहेब थोरात
राज्य सरकारच्या घोषणांना फसू नका
चंदनापुरी येथे 5 कोटी 27 लाख रुपये निधीच्या विविध विकास कामांचा शुभारंभ
प्रतिनिधी —
संगमनेर तालुक्यातील सर्व सहकारी संस्थांसह येथील चांगल्या वातावरणामुळे तालुक्याचा लौकिक निर्माण झाला आहे. सततच्या विकास कामातून येणाऱ्या विधानसभेतही मोठे यश मिळणार आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असेल असे सांगताना केंद्रातील भाजप सरकारची घमेंड महाराष्ट्राने उतरवली असून राज्य सरकारच्या निवडणुकीपुरत्या असणाऱ्या फसव्या घोषणांना फसू नका असे आवाहन काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथे आमदार थोरात यांच्या प्रयत्नातून पाच कोटी सत्तावीस लाख रुपये निधीच्या विविध विकास कामांचा शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी खासदार भाऊसाहेब वाकचौरे होते. तर व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, दुर्गाताई तांबे, युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात, रणजीतसिंह देशमुख,आर बी राहणे, विजय राहणे, सरपंच भाऊराव रहाणे, सुधाकर जोशी, आनंदराव कढणे, अजय फटांगरे यांच्यासह संगमनेर तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार थोरात म्हणाले की, केंद्रातील भाजप सरकारने स्वायत्त असलेल्या ईडी, सीबीआय सारख्या संस्था गुलाम बनवल्या. त्यातून दबावाचे राजकारण सुरू केले. देशात महागाई, बेरोजगारी वाढली असून शेतकरी, कामगार, सर्वसामान्य माणूस अडचणीत आहे. मात्र सरकारचे त्याकडे लक्ष नाही. जातिभेद आणि घमेंड असणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारला रोखण्याचे काम महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने आणि जनतेने केले आहे.
राज्यात आलेले सरकार जनतेला मान्य नाही. त्यांच्यामध्ये ताळमेळ नाही. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठे यश मिळणार असून संगमनेर मधूनही मोठे यश मिळणार आहे.

1985 पासून तालुक्यातील जनतेने खूप प्रेम केले. त्यामुळे राज्यात मिळालेल्या मोठ्या संधीचा सर्वसामान्यांच्या विकासासाठी उपयोग केला. निळवंडे धरण कालवे यांच्यासह अनेक कामे मार्गी लावली. सतत काम करत राहणे हे आपले वैशिष्ट्य आहे. राज्यात शरदचंद्र पवार उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आपल्याला मान मिळतो आहे. हे जनतेचे प्रेम असून आगामी काळामध्ये सर्वांनी एकजुटीने महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले.

तर खासदार भाऊसाहेब वाकचौरे म्हणाले की, काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले. आ. थोरात हे अत्यंत नम्र स्वभावाचे व सर्वांना स्वातंत्र्य देणारे नेतृत्व आगामी काळामध्ये नाशिक पुणे रेल्वे संगमनेर वरूनच जाण्याकरता आपण दिल्ली दरबारी पाठपुरावा करू असेही ते म्हणाले.

आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यात विकासाची गंगा आली आहे. त्यांनी कायम सर्वांना सोबत घेऊन काम केले असल्याने तालुक्याचे कुटुंबप्रमुख म्हणून आपण सर्वजण त्यांचा आदर करतो. मनाचा मोठेपणा असलेले आमदार थोरात हे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतील सर्वात पुढचे नाव असून सर्वांनी आमदार थोरात यांच्या नेतृत्वाखाली एकजुटीने काम करावे असे आवाहन केले

यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, डॉ.जयश्री थोरात, यांचीही भाषणे झाली. लहानभाऊ गुंजाळ, शांताराम कढणे, भाऊसाहेब कढणे, अनिल कढणे, कैलास सरोदे, शंकर राहणे, रोहिदास राहणे, उपसरपंच हौसाबाई कढणे, युवा काँग्रेसचे कार्याध्यक्ष हर्षल राहणे, अर्चना बालोडे, मीरा शेटे, गणपतराव सांगळे, विलास कवडे, शिवसेनेचे अमर कतारी, दिलीप साळगट, संघर्ष प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी युवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक सरपंच भाऊराव राहणे यांनी केले. सूत्रसंचालन नंदकिशोर राहणे यांनी केले. तर एस.एम. राहणे यांनी आभार मानले. यावेळी चंदनापुरी सह पंचक्रोशीतील नागरिक महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
