भोजापूर चारीवरून ज्यांनी विष कालविण्याचा प्रयत्न केला, ते आता पाणी प्रश्नावर गप्प आहेत — माजी मंत्री बाळासाहेब थोरात

संगमनेर तालुक्याला हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे – 

संगमनेर | प्रतिनिधी —

चिंचोली गुरव येथे झालेल्या पाणी परिषदेतून निळवंडे धरण सुरू झाले. या धरणासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला. अनेकांनी अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही धरण आणि दोन्ही कालवे आपण पूर्ण केले. आता पाणी आले आहे. उर्वरित भागालाही पाणी द्यायचे आहे. मात्र कॉंक्रिटीकरण करून पाणी पुढे नेले जात असून संगमनेर तालुक्याला आपल्या हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे अशी आग्रही मागणी करत भोजापुर चारीवरून ज्यांनी विष कालविण्याचा प्रयत्न केला ते आता पाणी प्रश्नावर गप्प असल्याचा आरोप निळवंडे धरण व कालव्याचे निर्माते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

तळेगाव दिघे येथील महाराजा लॉन्स येथे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने आयोजित ऊस विकास मेळावा कार्यक्रमात ते बोलत होते. 

थोरात म्हणाले की, म्हाळादेवी धरण झाले असते तर पाण्याची लेव्हल वर आली नसती. आणि नदीच्या कडेलाच पाण्याचा फायदा झाला असता. मात्र चिंचोली गुरव येथे पाणी परिषद झाली आणि निळवंडे धरणासाठी आपण पाठपुरावा सुरू केला. एक दिवसही विश्रांती न घेता धरण आणि कालवे पूर्ण दिले. ज्यांनी अडचणी निर्माण केल्या त्यात श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे. कालव्याला अस्तरीकरण केले जात असून पाणी पुढे नेले जात आहे. ते ही शेतकरी आमचेच आहे मात्र संगमनेर तालुक्याला हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे. पाणी विज या राजकारणापलीकडच्या गोष्टी आहेत. याबाबत नवीन लोकप्रतिनिधी काहीही बोलत नाही. हे दुर्दैवी आहे त्यांचे लक्ष दुसरीकडेच आहे.

निमोण, नान्नज दुमाला ,पारेगाव खुर्द ,पारेगाव बुद्रुक, तळेगाव ,सोनोशी , काकडवाडी, पिंपळे, करुले या गावांसाठी उपसा सिंचन योजना आपण मंजूर करून ठेवल्या होत्या. मात्र नव्या सत्ताधाऱ्यांनी या योजना रद्द केल्या आहेत. भोजापूर चारी आपण पूर्ण केली. पाणी आणण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. भोजापूर चारीवरून ज्यांनी या भागात विष कालविण्याचा प्रयत्न केला ते आता पाणी प्रश्नावर गप्प आहे. त्यांना आता सर्वांनी जाब विचारला पाहिजे.

निळवंडे चे पाणी पुढे नेले जात आहे. वीज मिळत नाही. पिक विमा मिळत नाही अशावेळी नवीन लोकप्रतिनिधी मात्र पूर्ण गप्प आहे. म्हणून आपल्याला सर्वांना जागृत व्हावे लागेल मतभेद विसरून पाण्यासाठी एकत्र या.

निळवंडे धरण व कालव्यांप्रमाणे काकडी विमानतळ आपण पूर्ण केले. रेल्वे मंजूर करून घेतली .तालुक्यात रेल्वे करता 560 कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले. त्यावेळी जी एम आर टी चे कोणतेही कारण नव्हते .आपण सत्तेत नाही आणि आता हे कारण पुढे काढून रेल्वे पळवण्याचा घाट घातला जात आहे. संगमनेर तालुक्याचा विकास ज्यांना पहावत नाही त्यांनी रेल्वे बाबत राजकारण केले आहे.

तळेगाव पाणीपुरवठा योजनेचे काम आपण केले

2000 मध्ये तळेगाव सह 16 गावांना पाणी मिळावे याकरता ही योजना सुरू केली. अनेक अडचणी आल्या मात्र कारखान्याच्या माध्यमातून सातत्याने सोडावून जनतेला पाणी दिले. 2019 मध्ये या योजने करता नव्याने 81 कोटी रुपये मंजूर केले. तालुक्यातील विविध गावांमधील पाणीपुरवठा योजनेसाठी 780 कोटी रुपये निधी मंजूर केला. मागील दीड वर्षापासून तळेगाव योजना बंद होती. कॉन्ट्रॅक्टरला महायुतीच्या व सत्ताधाऱ्यांचा कार्यकर्ता अडून पाहत होता. शेवटी त्याच्याशी संवाद साधून आपण प्रश्न मार्गी लावला. वडगाव पान तळ्यात पाणी आले आता प्रत्येक गावात पाणी पोहोचले आहे. हे पाणी आपल्यामुळे आले आहे. ज्यांचे काही योगदान नाही ते श्रेय घेण्यासाठी येत आहे. त्यांनी नवीन योजना नव्या काम करावी आणि खुशाल श्रेय घ्यावे असा टोला माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नाव न घेता लगावला.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!