चार पक्ष बदलणाऱ्या आमदार खताळ यांनी आपली निष्ठा तपासावी — अजय फटांगरे
संगमनेर प्रतिनिधी —
अहिल्यानगर जिल्हा हा पहिल्यापासून काँग्रेसचा बालेकिल्लाच होता. अनेकांना मंत्रिपदे विरोधी पक्ष नेते पदे देऊन अनेकांनी पक्षांतर केले आणि आज ते सत्ताधारी पक्षात आहेत. हे खरे आहे याशिवाय संगमनेरचे नवीन लोकप्रतिनिधी चार पक्षातून आलेले आहे त्यांनी पक्षनिष्ठेबाबत आधी पालकमंत्री व त्यांच्या वरिष्ठांना विचारले पाहिजे आणि स्वतः सध्या कोणत्या पक्षात आहेत हे सांगितले पाहिजे. आपली उंची किती आणि आपण कोणावर बोलतो हे तपासा अशी टीका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय फटांगरे यांनी केली आहे.

अजय फटांगरे व सोमेश्वर दिवटे यांनी दिलेल्या संयुक्त प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, नुकतेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संगमनेरचा दौरा केला आणि या दौऱ्यामध्ये त्यांनी स्पष्ट केले की लोकनेते बाळासाहेब थोरात हे आचार विचार पक्षनिष्ठा आणि प्रामाणिकपणा यामुळे राज्याला आदर्शवत नेतृत्व आहेत. त्यांच्या नेतृत्वाची राज्याला गरज आहे. एका निवडणुकीने मूल्यमापन होत नसते. इतिहासामध्येही अनेक मोठ्या नेत्यांना चढउतारांना सामोरे जावे लागले आहे. मात्र त्यानंतर येणारा टप्पा मोठा असतो. अनेकांनी पक्ष बदलले मात्र लोकनेते बाळासाहेब थोरात काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहेत.

पत्रकात पुढे म्हटले आहे की, अहिल्यानगर जिल्ह्यातून अनेकांना काँग्रेस पक्षाने मोठे केले, मंत्रीपद दिले, विविध जबाबदाऱ्या दिल्या आणि त्यांनी पक्ष अडचणीत असताना पक्ष सोडला. रणांगणा मधून पळायचे नसते तर लढायचे असते, हा महाराष्ट्राचा स्वाभिमानी मंत्र आहे. मात्र बरेच जण रणांगण सोडून सत्ताधाऱ्यांच्या आश्रयाला गेले आहेत.
त्यात संगमनेरचे नवीन लोकप्रतिनिधी हे राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय जनता पक्ष यांच्या मांडवाखालून येत आता शिवसेना या पक्षाकडून आमदार झाले आहेत. मात्र ते आत्ताही भाजपशी संधान साधून आहेत. ते नेमके कोणत्या पक्षाचे आहे हे त्यांना माहित नाही. पालकमंत्री सांगतील ते काम हे करतात आणि प्रसिद्धीसाठी वक्तव्य करत आहेत.

खरे तर असे वक्तव्य करताना त्यांनी पालकमंत्र्यांना विचारले पाहिजे की, जिल्ह्यामध्ये काँग्रेस मध्ये विविध पदे उपभोगून काँग्रेस पक्ष कोणी सोडला याचे सहज उत्तर सर्वसामान्य जनता देईल. पक्षनिष्ठ बाबत नवीन लोकप्रतिनिधीने बोलू नये कारण त्यांनाच त्यांचा पक्ष माहीत नाही अशी टीकाही फटांगरे – दिवटे त्यांनी केली.
सोमेश्वर दिवटे यांनी असे म्हटले आहे की, आपली उंची किती आपण बोलतो किती, हे महत्त्वाचे आहे. 2024 च्या निवडणुकीमध्ये अपघात झाला. पण जनतेला चूक कळाली आहे. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात संपूर्ण देशांमध्ये मोठी लाट आहे. सर्वसामान्य नागरिक अस्वस्थ आहे
पेट्रोल डिझेलची मोठी भाव वाढ झाली आहे. रुपयाचे अवमूल्यन झाले आहे. बेरोजगारी वाढली आहे आणि हे मूलभूत प्रश्न असताना आता जाती-धर्माच्या नावावर तरुणांचे लक्ष वळवले जात आहे. संगमनेरचे लोकप्रतिनिधी हे एक फोटो काढता तरी चार निवेदन दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध करतात. मागील दोन वर्षात त्यांचे एक तरी काम दाखवावे.

मागील दीड वर्षात राजकीय संस्कृती खराब झाली
मागील दीड वर्षापासून संगमनेर मध्ये वाळू तस्करी, टक्केवारी, हप्ते खोरी वाढली आहे. याचबरोबर जाती धर्माचे राजकारण वाढले आहे. सुसंस्कृत राजकारणाची परंपरा असलेल्या संगमनेर मध्ये या लोकांनी नवीनच सगळे सुरू केले असून हे संगमनेरकरांना कधीही आवडणारे नाही. लोकनेते बाळासाहेब थोरात हे राज्याचे सुसंस्कृत नेतृत्व आहे त्यांच्यावर कोणी बोलावे इतके समोरचे मोठे नाही अशी टीका तालुकाध्यक्ष अर्चना बालोडे यांनी केली आहे.
आमदार खताळ यांचे चार पक्ष – निर्मला गुंजाळ
संगमनेरचे नवीन लोकप्रतिनिधी खताळ यांनी सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस नंतर भारतीय काँग्रेस नंतर भाजपा व आता शिवसेना असा चार पक्षांशी घरोबा केला आहे. आता शिवसेनेमध्ये असून सुद्धा ते भाजपचे काम करत आहेत. स्वतः चार पक्ष बदलणाऱ्यांनी एकनिष्ठ व प्रामाणिक असलेल्या नेतृत्वावर बोलू नये. आपण कुणावर बोलतो याचे भान ठेवावे असा सल्ला जिल्हा परिषद माजी सदस्य निर्मला गुंजाळ यांनी दिला आहे.
