आजोबासह नातवाचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू 

संगमनेर तालुक्यातील घटना 

प्रतिनिधी —

आजोबासह नातवाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे गावात पिंपळमळा येथे गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे. संगमनेरमध्ये सातत्याने शेततळ्यात बुडून मृत्यूच्या वेदनादायक घटना समोर येत आहेत.

शिवाजी आत्याबा सोनवणे (वय ६६) व समर्थ नितीन सोनवणे (वय ३) असे शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झालेल्या आजोबा-नातवाचे नाव आहे.

गुरुवारी दुपारच्या वेळी शिवाजी सोनवणे हे आपल्या शेतातील शेततळ्यालगत औषध फवारणी करत होते. याच दरम्यान त्यांच्या घरी पाहुणे आले म्हणून त्यांचा तीन वर्षाचा नातू समर्थ हा त्यांना बोलाविण्यासाठी शेततळ्याजवळ आला होता. तेथे खेळता खेळता तो शेततळ्यात पडला.

पाठोपाठ त्याला वाचविण्यासाठी आजोबा शिवाजी सोनवणे यांनीही पाण्याने पूर्ण भरलेल्या शेततळ्यात उडी मारली. मात्र ते नातवाला वाचवू शकले नाही. शेततळ्यात बुडून दोघांचाही मृत्यू झाला.

घटनेची माहिती समजतात सोनवणे यांचा मुलगा नितीन सोनवणे यांनी आसपासच्या नागरिकांना आवाज देत गोळा केले. ग्रामस्थांच्या मदतीने दोघांनाही तळ्यातून बाहेर काढत उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तत्पूर्वीच आजोबा आणि नातवाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पंचनामा करण्याचे काम सुरू होते. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!