अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राचा उमदा नेता गमावला — माजीमंत्री बाळासाहेब थोरात
दमदार प्रशासक हरपला — माजी आमदार डॉ.सुधीर तांबे
महाराष्ट्राचा लढवय्या नेता हरपला — आमदार सत्यजित तांबे
संगमनेर | प्रतिनिधी
स्पष्ट बोलने, कामाची मोठी उरक आणि प्रशासनावर पकड असल्याबरोबर कठोर निर्णय घेण्याची क्षमता असलेले अजित पवार यांच्या अपघाती निधनाची बातमी ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत दुःख दायक असून त्यांच्या निधनाने राज्याने उमदा नेता गमावला असल्याची भावना माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची बातमी समजतात संपूर्ण महाराष्ट्र हळहळला असून बाळासाहेब थोरात यांनी भावना व्यक्त करताना म्हटले की, अनेक वर्ष अजित दादा पवार आणि आम्ही एकत्र काम केले आहे. स्पष्ट बोलण्याबरोबर कठोर निर्णय घेण्याची त्यांची क्षमता होती. विविध खात्यांची जबाबदारी त्यांनी अत्यंत सक्षमपणे सांभाळून सर्वांना भावणारी त्यांची वकृत्व शैली होती. राजकीय कारकीर्द अत्यंत मोठी असताना अचानकपणे काळाने घातलेला घाला हा अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांच्या जाण्याने प्रशासनावर पकड असलेला लोकप्रिय उमदा नेता गमावला असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
दमदार प्रशासक हरपला — माजी आमदार डॉ.सुधीर तांबे
महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक वर्ष केंद्रस्थानी असलेले अजित पवार यांची प्रशासनावर मोठी पकड होती. ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातील प्रश्नांची जाण असणाऱ्या या नेतृत्वाने आपल्या कामातून मोठी ओळख निर्माण केली. त्यांच्या निधनाची बातमी ही सर्वांसाठी अत्यंत वेदनादायी असून अजित पवार यांच्या आकस्मात निधनाने महाराष्ट्राच्या प्रशासनातील दमदार व्यक्ती हरपले असल्याची भावना माजी आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्राचा लढवय्या नेता हरपला — आमदार सत्यजित तांबे
लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे असे बाजीप्रभू देशपांडे बोलल्याची इतिहासात नोंद आहे. अजित पवार यांच्या निधनाने कर्ता व्यक्ती गेली आहे. फटकळ बोलणारा स्पष्ट वक्ता, पण तेवढ्याच तत्परतेने चूक मान्य करून सॉरी बोलणारे अजित पवार हे अत्यंत लोकप्रिय होते. सकाळी लवकर उठून कामाची उरक असणारा आणि प्रशासनावर जरब असणारा एक कुशल राजकारणी, मनमोकळा स्वभाव असलेले अजित दादा यांच्या निधनाने महाराष्ट्राचा लढवय्या नेता हरपला असल्याची भावना आमदार सत्यजित तांबे यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील लाडके दादा – डॉ.जयश्री थोरात
अत्यंत रुबाबदार व्यक्तिमत्व असलेले अजित दादा यांची तत्परतेने काम करण्याची पद्धत, विविध प्रश्नांची जाण, आणि स्पष्ट बोलण्याची पद्धत ही महाराष्ट्रातील जनतेमध्ये अत्यंत लोकप्रिय होती. महाराष्ट्राच्या राजकारणातील या अष्टपैलू व्यक्तिमत्वाने आपल्या कामातून जनतेच्या मनामध्ये दादा या नावाने ओळख निर्माण केली. कामात दादा असलेले अजित दादा आता पुन्हा आपल्याला दिसणार नाही ही मोठी उणीव महाराष्ट्राला असेल अशी भावना युवा काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ.जयश्री थोरात यांनी व्यक्त केली आहे.
