वटसावित्री पौर्णिमेनिमित्त संगमनेर तालुक्यात 2121 वटवृक्षांचे रोपण
दंडकारण्य अभियानांतर्गत प्रत्येक गावात किमान 5 वटवृक्षांचे रोपण
प्रतिनिधी —
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या दंडकारण्य अभियानांतर्गत वटसावित्री पौर्णिमेनिमित्त संगमनेर 2121 वटवृक्षाचे रोपण करण्यात आले असून त्याच्या संवर्धनाची जबाबदारी स्थानिक महिलांवर देण्यात आली आहे. प्रत्येक वृक्षाचे संवर्धन गावकऱ्यांनी करावे असे आवाहन प्रकल्प प्रमुख दुर्गाताई तांबे यांनी केले आहे.

कारखाना कार्यस्थळावर अमृतेश्वर मंदिर येथे दंडकारण्य अभियानांतर्गत वटसावित्री पौर्णिमेनिमित्त वटवृक्ष रोपण अभियान सुरू करण्यात आले यावेळी प्रकल्प प्रमुख दुर्गाताई तांबे, डॉ.जयश्री थोरात, अर्चना बालोडे, निर्मला गुंजाळ, सुनंदा जोर्वेकर, पद्मा थोरात, निर्मला राऊत, बेबीताई थोरात, प्रतिभा जोंधळे, अरुणा हिंगे, शितल उगलमुगले, सुनीता कांदळकर, प्राजक्ता घुले, सुरभी मोरे, नंदा कढणे, स्वाती राऊत, प्रीती फटांगरे, रोहिणी गुंजाळ, सुषमा भालेराव आदींसह महिला उपस्थित होत्या.

यानंतर गणनिहाय महिलांनी ग्रुप करून गावोगावी भेट देत प्रत्येक गावात किमान पाच वटवृक्षांचे रोपण केले. संगमनेर तालुक्यातील 171 गावे व 258 वाड्यावर एकूण 2121 वटवृक्षांचे रोपण करण्यात आले.
दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, भारतीय संस्कृतीमध्ये वटपौर्णिमेला मोठे महत्त्व आहे. वटपौर्णिमेनिमित्त वड या देववृक्षाचे पूजन केले जाते. वड हा दीर्घायुषी असून मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देतो. अध्यात्मिक आणि शास्त्रीय असे दोन्ही कारण वट पूजेची असून दंडकारण्य अभियानांतर्गत मागील 16 वर्षापासून दरवर्षी आपण गावोगावी मोठे वृक्षारोपण करतो.

यामुळे संगमनेर तालुक्यात वृक्ष संवर्धन संस्कृती वाढली असून डोंगर आता हिरवेगार दिसू लागली आहेत. घराबरोबर आपला परिसर स्वच्छ ठेवून प्रत्येकाने पर्यावरण संवर्धन चळवळीत सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
डॉ.जयश्री थोरात म्हणाल्या की, या अभियानाची नोंद ही आंतरराष्ट्रीय पातळीवर झाली आहे. पर्यावरण संवर्धन हे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोरोना ने सर्वांना ऑक्सिजनचे महत्व कळाले आहे. वृक्ष ऑक्सिजन देत असून वड, पिंपळ, उंबर, कडुलिंब हे वृक्ष जास्त प्रमाणात ऑक्सिजन देतात. म्हणून यापुढे प्रत्येकाने किमान दोन वृक्षांचे रोपण करून त्याचे संगोपन करावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, समन्वयक प्रा.बाबा खरात, श्रीराम कुऱ्हे, किरण कानवडे, बाळासाहेब सावंत, बाळासाहेब फापाळे आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते. प्रा.बाबा खरात यांनी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पर्यावरण संवर्धनाची गीते गायली.
