संगमनेर शहरातील शांतता बिघडवणाऱ्यांचा उद्देश सफल होऊ देऊ नका – आमदार थोरात
प्रतिनिधी —
संगमनेर शहर व तालुका हा शांततेसाठी, बंधूभावासाठी आणि आपल्या प्रगतीसाठी राज्यात प्रसिद्ध आहे. एक सांस्कृतिक शहर म्हणून संगमनेरची ओळख आता महाराष्ट्रात आणि देशात निर्माण झाली आहे. राज्यभर संगमनेरचे कौतुक होत असताना काही प्रवृत्ती मात्र ही शांतता आणि बंधुभाव बिघडवण्याचा प्रयत्न करत असून त्यांचा उद्देश सफल होऊ देऊ नका असे आवाहन काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

संगमनेर शहर व तालुक्यात गेल्या काही दिवसापासून असंविधानिक आणि समाजात धार्मिक तेढ निर्माण होईल अशा घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर जनतेला आवाहन करताना आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले की, संगमनेर शहर व तालुक्याचा चांगल्या कामामुळे राज्यात लौकिक आहे. मात्र अलीकडच्या काळात काही प्रवृत्ती संगमनेरची शांतता, सुव्यवस्था व बंधुभाव बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. या शहरात दंगली कशा होतील यासाठी सातत्याने काम करणारी ही प्रवृत्ती आपल्याला पहावयास मिळत आहे.

अशा काळामध्ये आपला बंधुभाव टिकवणे, शांतता टिकवणे आणि आपल्या शहराचा आणि तालुक्याचा जो सुसंस्कृतपणाचा लौकिक आहे, तो टिकवणे ही आपल्या प्रत्येकाची निश्चितपणे जबाबदारी आहे. आणि ती जबाबदारी आपण सर्वांनी पार पाडलीच पाहिजे

या निमित्ताने प्रशासनाला सूचना आहे की, यामध्ये जो कोणी चुकीचे वागत असेल. जो कोणी गुन्हेगार असेल त्याला कडक शिक्षा केली पाहिजे. जो कोणी अफवा उठवत असेल, किंवा जो कोणी प्रक्षोभक भाषणे करून दंगली कशा होतील यासाठी प्रयत्न करत असेल त्याच्यावर कडवी नजर ठेवून त्यांचाही तातडीने बंदोबस्त केला पाहिजे. आणि त्यांना कडक शिक्षा झालीच पाहिजे या मताचा मी आहे.

यामुळे जो चुकीचे वागतो त्याला शिक्षा होईल आणि निरपराध नागरिकांना त्रास होणार नाही. या निरपेक्ष भावनेने प्रशासनाने काम केले पाहिजे. आपण सर्वांनी, तालुक्यातील व शहरातील जनतेने आपल्या शहराचा व तालुक्याचा लौकिक वाढवणारा बंधुभाव, शांतता आणि सुव्यवस्था वाढविण्याच्या दृष्टीने जे काम करतील त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले पाहिजे.

आणि या पुढील काळात आपण सर्वांनी मिळून आपले शहर हे अत्यंत आनंदी शहर म्हणून लौकिक कसा वाढेल यासाठी सर्वांनी काम करावे असे आवाहनही आमदार बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर शहर व तालुक्यातील जनतेला केले आहे.

