संगमनेरची शांतता बिघडविणाऱ्यांवर कडक कारवाई करा !
प्रांताधिकारी, पोलीस उपअधीक्षकांना निवेदन
प्रतिनिधी —
गेल्या काही दिवसांपासून संगमनेरमध्ये अशांतता निर्माण करणाऱ्या, कायदा सुव्यवस्थेलाच आव्हान देणाऱ्या घटना सातत्याने दोन धर्मीयात घडत आहेत. काही अपप्रवृत्ती शहरात अशांतता निर्माण करत असून अशा चितावणीखोर व गुन्हेगारांवर तातडीने कडक कारवाई करावी अशी मागणी आज सर्वपक्षीय व सर्वधर्मीय, शांतता प्रिय संगमनेरकर नागरिकांनी केली आहे.

संगमनेरची शांतता धोक्यात आणणाऱ्या प्रवृत्तींवर कारवाईच्या मागणीसाठी प्रांताधिकारी शैलेश हिंगे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना निवेदन देण्यात आले.

माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, दिलीप पुंड, विश्वास मुर्तडक, उद्योजक मनीष मालपाणी, काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, शिवसेनेचे माजी शहर प्रमुख अमर कतारी, संजय फड, शिवजयंती उत्सव समितीचे सागर बागे, भाजपा युवा मोर्चाचे दीपेश ताटकर, व्यापारी असोसिएशनचे प्रकाश कलंत्री, गजेंद्र नाकील, मोहसीन शेख, दीपक साळुंखे, संतोष करवा, जावेद शेख, रियाज सय्यद, समीर ओझा, गजेंद्र अभंग, नरेंद्र ओझा, आजिज ओहरा , गणेश मादास, जसपाल डंग, ओंकार भंडारी, किशोर पवार, मोहसीन रशीद शेख, अर्चना बालोडे, डॉ. श्रद्धा वाणी, संज्योत वैद्य, निर्मला गुंजाळ, डॉ. दिपाली पानसरे, किशोर टोकसे, वकील संघाचे अध्यक्ष ॲड. उदयसिंह ढोमसे पाटील, शिवकुमार भंगीरे, प्रमोद कडलग, सागर कानकाटे, शेख सलाउद्दीन अहमद, रुपेश कोल्हे, बाळासाहेब पवार, त्रिलोक सिंग पंजाबी, राजेंद्र वाघचौरे, स्वाती समीर शहा, सय्यद कादरी, जुगलकिशोर बाहेती, कमलेश उनवणे, अतुल अभंग यांच्यासह सर्वपक्षीय, सर्वधर्मीय नागरिक उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, गेल्या अनेक दिवसापासून संगमनेर शहर व तालुक्यातील जनतेमध्ये अस्वस्थता व अशांतता निर्माण करण्याच्या घटना सातत्याने घडत आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेर शहरातील व तालुक्यातील सर्वसाधारण नागरिक, व्यावसायिक व इतर वर्ग यांना वेठीस धरण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहे. संगमनेर हे सुसंस्कृत गाव असून अशांतता निर्माण करणाऱ्या अशा अपप्रवृत्तींना जनतेने नेहमीच एकत्रितपणे विरोध केला आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाने निरपेक्ष रहावे व अशांतता पसरवणाऱ्या गुन्हेगारांना आणि चिथावणीखोरांना वेळीच पायबंध घालावा. तसेच त्यांच्यावर तातडीने कडक कारवाई करण्यात यावी. शांतता, सुव्यवस्था निर्माण करण्याच्या प्रशासनास प्रयत्न आमचे कायम सहकार्य राहील याची ग्वाही आम्ही देतो.

संगमनेरची शांतता भंग करण्यासाठी काही अज्ञात शक्ती षडयंत्र करत आहेत. हे अगदी मोजके लोक असून त्यांच्या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नका तसेच अशा विध्वंसक प्रवृत्तीच्या लोकांना ओळखून तातडीने पोलीस यंत्रणांना माहिती द्या. अशांतता निर्माण करू पाहणारे गुन्हेगार व त्यांच्या पाठीशी असणारे चिथावणीखोर यांच्यावरही प्रशासनाने तातडीने कडक कारवाई करावी.
दुर्गाताई तांबे (माजी नगराध्यक्ष)

सणासुदीच्या व उत्सवाच्या काळामध्ये काही मोजक्या लोकांकडून अशांतता निर्माण करून सामाजिक तेढ निर्माण केली जात आहे. हे अत्यंत दुर्दैवी असून संगमनेरमधील सुज्ञ, सुजाण व सुसंस्कृत नागरीक अशा कुटिल कारस्थानांना बळी पडणार नाही. अशी भावना सामान्य नागरिकांमधून व्यक्त होत असून कोणीही अफवा पसरू नये. तसेच चुकीच्या लोकांना पाठीशी घालू नये.
अमर कतारी (माजी शहरप्रमुख, शिवसेना (ठाकरे)

