पालकत्व कसे निभवायचे आंम्हाला कळते, काही गोष्टी आमच्यकडून शिका — महसूल मंत्री विखे पाटील

संगमनेर तालुक्यात कोणत्याही कामाला चिठ्ठीची गरज भासणार नाही. दलालांच्या ताब्यात गेलेला तालुका आता सामान्य लोकांच्या हातात द्यायचा असल्याने सरकार जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून सरकारची सर्वाना न्याय देण्याची भूमिका आहे.

प्रतिनिधी —
जिल्ह्यातील जनतेला न्याय देण्यासाठी शासन कटीबध्द आहे. अनेक वर्षे सत्ता असूनही ज्यांना तालुक्याला पाणी देता आले नाही त्यांनी आम्हाला सल्ले देण्याच्या भानगडीत पडू नये पालकत्व कसे निभावयाचे आम्हांला चांगले कळते तुम्हीच आमच्याकडून काही शिका अशी खोचक टिका महसूल पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर केली आहे.

संगमनेर येथील ‘शासन आपल्या दारी’ या अभियानात शासकीय योजनांच्या लाभांचे लाभार्थ्यांना महसूलमंत्र्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी महसूलमंत्री बोलत होते. जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, संगमनेर उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे, तहसीलदार धीरज मांजरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराडे, गटविकास अधिकारी अनिल नागणे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे नितीन दिनकर, ॲड. श्रीराम गणपुले, अमोल खताळ आदी यावेळी उपस्थित होते.

‘शासन आपल्या दारी’ अभियानात संगमनेर तालुक्यातील एक हजार लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्यात येत आहे. असे नमूद करून महसूलमंत्री विखे पाटील म्हणाले, महिलांना देशपातळीवर आरक्षण देऊन देशाच्या विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. शासन आपल्या दारी योजनेत जिल्ह्यात जवळपास २४ लाख लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. एक रूपयात पीक विमा सारखी सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी योजना आणली. यामुळे जिल्ह्यात ११ लाख ८० हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. राज्यात ‘शासन आपल्या दारी’ योजनेत दीड कोटी लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे.

ऑनलाईन दाखल्यांसाठी फी आकारणी करणारी सेतू सुविधा केंद्राच्या तक्रारी आल्यास त्यांची मान्यता रद्द करण्यात येईल. अवैध वाळू वाहतूकीला लगाम बसला आहे. जलजीवन मिशन मधील अवैध कामांना आळा घालण्यासाठी काम करण्यात येईल. लोकांच्या मनातील सरकार आहे. शासनाने घरोघरी आनंदाचा शिधा वाटप केला. कोणीही शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहणार नाही. अशा शब्दांत त्यांनी उपस्थितांना आश्वस्त केले.

राज्यात ट्रिपल इंजिन सरकार काम करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आशीर्वाद सरकारच्या पाठीशी आहे. जनतेत जावून काम करणारे हे सरकार आहे. मागच्या सरकारच्या काळात कोणताही न्याय जनतेला मिळाला नाही. आता जनतेच्या मनातील सरकार असल्याने निर्णय तसे होत आहेत. महीलांना ३३टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाबद्दल पंतप्रधान मोदींचे त्यांनी अभिनंदन केले.

तालुक्यात कोणत्याही कामाला चिठ्ठीची गरज भासणार नाही. दलालांच्या ताब्यात गेलेला तालुका आता सामान्य लोकांच्या हातात द्यायचा असल्याने सरकार जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून सरकारची सर्वाना न्याय देण्याची भूमिका आहे. निळवंडे धरणातून कलव्याकरीता ३० सप्टेंबर रोजी पाणी सोडण्यात येणार असल्याचे स्पष्ट करून डाव्या कालव्यांची काम प्रगतीपथावर आहेत. काही भागात ठेकेदारांनी कामे जाणीवपुर्वक रखवडली असून त्यांच्याबाबत कठोर निर्णय घेणार असल्याचा इशारा विखे पाटील यांनी दिला.

जिल्हाधिकारी म्हणाले की, शासन आपल्या दारी उपक्रमांत वेगवेगळ्या विभागांत २५ लाख विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आला. आज संगमनेर मधील ११०० पेक्षा जास्त लाभार्थ्यांना लाभ दिला आहे. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना कृषी यांत्रिकीकरणात २३ टॅकर व नगरपालिकेला ४ घंटागाड्याचे वाटप करण्यात आले. ‘मेरी माटी मेरा देश’ अभियानातील अमृत कलक्ष यात्रा व्हॅनचे यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. ५० पेक्षा लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभ प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. प्रास्ताविक अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी केले.

