तर…. संगमनेर मर्चंट बँकेची निवडणूक बिनविरोध होऊ शकते — ज्ञानेश्वर कर्पे
प्रतिनिधी —
चार विरोधी उमेदवारांना सत्ताधाऱ्यांनी सामावून घेतले तर मर्चंट बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यास सहकार्य करू अशी प्रतिक्रिया अपक्ष उमेदवार ज्ञानेश्वर कर्पे यांनी दिली आहे.
संगमनेर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज छाननीनंतर कर्पे यांनी वरील प्रतिक्रिया दिली आहे.

संगमनेर मर्चंट बँकेची निवडणूक हा शहरासह संपूर्ण तालुक्यात चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय असतो. व्यापारी क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या या बँकेच्या निवडणुकीत व्यापारी मंडळी मोठ्या उत्साहाने भाग घेतात.

बँकेचे संस्थापक स्वर्गीय ओंकारनाथ मालपाणी यांची बँकेवर अनेक वर्षे एक हाती सत्ता होती. त्यानंतर त्यांचे सुपुत्र उद्योजक राजेश मालपाणी यांनी मर्चंट बँकेची धुरा आजतागायत यशस्वीपणे सांभाळली आहे.

असे असले तरी मर्चंट बँकेच्या निवडणुकीत मालपाणी यांना विरोधकांनी वेळोवेळी शह – काटशह दिले आहेत. विरोधकही मोठ्या संख्येने यापूर्वी निवडून आले आहेत. संगमनेरचा सहकार समृद्ध आहे. व्यापारी वर्ग देखील सहकारात कुठेही मागे पडलेला नाही.

त्यामुळे संगमनेरच्या या महत्त्वाच्या बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी आणि निवडणुकीत होणारा लाखो रुपयांचा खर्च टाळावा अशी अपेक्षा अनेकांची असते. सत्ताधारी मंडळी आणि विरोधक यांच्यात समन्वय साधला गेला तर ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते.

यावेळी संगमनेर मर्चंट बँकेतील सत्ताधारी राजेश मालपाणी यांच्या गटाच्या विरोधातले पारंपारिक विरोधक राजेश (श्याम) करवा, ज्ञानेश्वर करपे, संदीप (खेमू शेठ) जाजू आणि प्रकाश कलंत्री या चार विरोधकांना सत्ताधाऱ्यांनी एकमताने सत्तेत सामावून घेतले तर मर्चंट बँकेची निवडणूक बिनविरोध होऊ शकते. अशी प्रतिक्रिया ज्ञानेश्वर कर्पे यांनी दिली आहे.

बँकेच्या इतिहासात निवडणुक बिनविरोध करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहे. त्याला यश येईल असे असेही कर्पे यांनी सांगितले. आता सत्ताधारी राजेश मालपाणी गट याप्रकरणी काय निर्णय घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

