महाराष्ट्राचे लोकनेतृत्व – आमदार बाळासाहेब थोरात
नामदेव कहांडळ
छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर,आणि संत महात्म्यांचा वारसा असलेले महाराष्ट्र हे देशातील सर्वात प्रगत राज्य आहे. या महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वांना सोबत घेऊन चालणारे जन माणसांच्या विकासासाठी सातत्याने काम करणारे स्वच्छ, सुसंस्कृत व स्थितप्रज्ञ नेतृत्व म्हणजे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात होय.

थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांचा संस्कार घेऊन यशवंतराव चव्हाण यांच्या विचारावर काम करणारे आ. बाळासाहेब थोरात हे 1985 पासून संगमनेर विधानसभा मतदारसंघातून विक्रमी मताधिक्याने सलग आठ वेळा विजयी झालेली आहेत. महाराष्ट्राच्या विधिमंडळातील सध्या ते सर्वात ज्येष्ठ व अनुभवी सदस्य आहेत. 37 वर्षाच्या आपल्या राजकीय कारकीर्दीत अनेक महत्त्वाची मंत्रिपदी भूषवताना या खात्यांना न्याय दिला आहे. सर्वाधिक काळ महसूल मंत्री, कृषिमंत्री पदाबरोबरच शालेय शिक्षण, राजशिष्टाचार, खार जमीन, जलसंधारण, रोहयो, पाटबंधारे अशी महत्त्वाची खाती सांभाळली आहेत.

राजकारण हे फक्त निवडणुकीपुरते ठेवून निवडणुकीचा निकाल लागले की लगेच समाजकारणाला त्यांनी सुरुवात केली आहे. पक्षभेद कधीही त्यांनी केला नाही आणि यामुळेच संपूर्ण महाराष्ट्र ते लोकप्रिय आहेत. पक्षविरहित अनेकांशी त्यांची मैत्री आहे. साहित्य, कला, क्रीडा, शिक्षण अशा विविध क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान आहे. याचबरोबर सहकारातून समृद्धी निर्माण करताना संगमनेर तालुका त्यांनी विकासाचे मॉडेल म्हणून उभा केला आहे.

सकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत अविश्रांत काम करणारे या स्वच्छ नेतृत्वाने जनमाणसांच्या विकासाबरोबर पक्ष वाढीसाठी मोठे काम केले आहे. यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाचा त्यांच्यावर मोठा विश्वास आहे. गांधी परिवाराशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध यामुळे केंद्रीय पातळीवरही त्यांनी काम केले आहे. याचीच पावती म्हणून खासदार राहुल गांधी यांनी संगमनेरला मुक्कामही केला आहे. काँग्रेसच्या वर्किंग कमिटीचे सदस्य, हिमाचल व गुजरातचे निरीक्षक याचबरोबर अत्यंत अडचणीच्या काळामध्ये 2019 ला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद सांभाळताना त्यांनी पक्षाला अडचणीतून बाहेर काढत सत्तेवर पोहोचविले. अडचणीच्या काळात पक्षाचे नेतृत्व करणारे स्वातंत्र्यसेनानींच्या या सुपुत्राने काँग्रेसचे बाजीप्रभू म्हणून खिंड लढवली आहे. अत्यंत संयमी, स्थितप्रज्ञ असल्या आमदार थोरात यांनी न भूतो न भविष्यती असे झालेल्या महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणूनही काम केले.

राज्य व देश पातळीवर आपल्या प्रभावी कार्यकर्तृत्वाने संगमनेर व नगर जिल्ह्याचा लौकिक वाढवताना त्यांनी नगर जिल्ह्यातील दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे च्या कामाला अत्यंत गति दिली. जीवनाचे ध्येय मानून या कालव्यांचे कामे रात्रंदिवस सुरू ठेवले. कालव्यासाठी मोठा निधी मिळवला. ऑक्टोबर 2022 मध्ये दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना पाणी देण्याचे त्यांचे स्वप्न होते मात्र सरकार बदलले आणि कालव्यांची कामे थंडावली. तरीही या कालव्यांचा पाठपुरावा तेच करणार असून जीवनाचे हे स्वप्न ते पुर्ण करणार आहेत.

सत्ता असो वा नसो जनतेच्या मनातील नामदार हे पद कायम आहे. सत्ता बदल झाल्यानंतर ही संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांची लोकप्रियता कायम असून राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत व स्वच्छ चेहरा म्हणून बाळासाहेब थोरात हे ओळखले जात आहेत. अनेक संकटे आली तरी पक्षनिष्ठा त्यांची कायम राहिली आहे

देशातील एकात्मता व लोकशाही टिकवण्यासाठी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर या साडेतीन हजार किलोमीटर काढलेल्या भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्रातील नियोजन हे आमदार थोरात यांचेकडे होते. महाराष्ट्राचे मुख्य समन्वयक म्हणून परफेक्ट मॅनेजमेंट करताना महाराष्ट्रातील 382 किलोमीटरच्या प्रवासातील यात्रेचे अत्यंत काटेकोर नियोजन केले.

7 नोव्हेंबर रोजी नांदेड जिल्ह्यात आगमन झालेल्या या यात्रेचे नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यांमधून सर्व भारत यात्रेची व्यवस्था, स्थानिक व त्या भागातील कार्यकर्त्यांना विश्वासात घेत प्रशासनाने केलेली तयारी. या तयारीचा दररोज घेतला जाणारा आढावा. महाराष्ट्राची व देशाची सांस्कृतिक परंपरा दाखवणाऱ्या वेशभूषा करून सहभागी झालेले तरुण, कष्टकरी, नागरिक, महिला यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

त्याचप्रमाणे पुरोगामी विचारांच्या विविध संघटना ,साहित्यिक, कवी, लेखक, विचारवंत, अभिनेते यांनी दिलेला पाठिंबा यामुळे महाराष्ट्रातील या भारत जोडो यात्रेला अभूतपूर्व उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ह्या उत्स्फूर्त प्रतिसादाची आणि उत्कृष्ट नियोजनाचे श्रेय हे भारत जोडो यात्रेचे मुख्य समन्वयक काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांना जाते.

याचबरोबर शेगाव येथे झालेली अति विराट सभा ही आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मॅनेजमेंटची चुणूक ठरली. या संपूर्ण नियोजनाचे देशपातळीवर कौतुक झाले.

काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेतृत्व करताना सर्व आमदारांना विश्वासात घेऊन काँग्रेस पक्षाला ग्रामपंचायत ते स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही त्यांनी मोठे यश मिळवून दिले. आज काँग्रेसचा मुख्य चेहरा म्हणून ते महाराष्ट्रात ओळखले जात आहेत. असे हे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा सांगणारे लोक नेतृत्व आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा
नामदेव कहांडळ, संगमनेर
(आमदार बाळासाहेब थोरात यांचे जनसंपर्क अधिकारी)

