मूलनिवासी आदिवासी हेच देशाचे खरे मालक — राहुल गांधी
आदिवासींच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी काँग्रेस सदैव कट्टीबद्ध
प्रतिनिधी —
आदिवासी समाजाच्या न्याय, हक्कासाठी बिरसा मुंडा ब्रिटिश सरकारच्या विरोधात लढले. वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी शहिद झाले. ब्रिटिशांच्या बलाढ्य सत्तेसमोर ते झुकले नाहीत. हजारो वर्षांपासून जंगलांचे रक्षण आदिवासी बांधवांनीच केले. आदिवासी बांधवच या देशाचे मूलनिवासी व खरे मालक आहेत, असे खासदार राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित वाशिम जिल्ह्यातील कार्यक्रमात ते बोलत होते. राहुल गांधी म्हणाले की, देशाच्या जमिनीवर पहिला हक्क आदिवासी बांधवांचा आहे. ही जमीन तुमची आहे पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपा तुम्हाला आदिवासी मानत नाही वनवासी म्हणते, भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांवर हे आक्रमण करत आहेत. वनवासी संबोधून तुमचे हक्क हिरावून घेतले जात आहेत.

पण काँग्रेस पक्ष सदैव आदिवासी बांधवांच्या कल्याणासाठी कट्टीबद्ध आहे. काँग्रेस सरकारने आदिवासींच्या हक्कासाठी निर्णय घेतले. भाजपा संविधानच मानत नाही. त्यामुळे आदिवासी, दलित, वंचित, अल्पसंख्याक समाजाला त्यांचे हक्क मिळू नयेत अशी भाजपाची भूमिका आहे.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, भगवान बिरसा मुंडा हे जुलमी ब्रिटिश सत्तेविरोधात लढले. आज आपल्याला जुलमी भाजपा सरकारच्या विरोधात लढायचे आहे. वनवासी म्हणून भाजपा आदिवासी बांधवांचा अपमान करत आहे. आदिवासी बांधवांचे हक्क काँग्रेसच देऊ शकते. त्यासाठी काँग्रेसचे सरकार आले पाहिजे व राहुल गांधी पंतप्रधान झाले पाहिजेत. देशाचे संविधान, तिरंगा सहीसलामत रहावा यासाठीच राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली आहे असेही नाना पटोले म्हणाले.

यावेळी व्यासपीठावर प्रभारी एच के पाटील, विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, अखिल भारतीय आदिवासी विभाभागाचे अध्यक्ष शिवाजीराव मोघे, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, AICC चे सचिव सहप्रभारी आशिष दुआ व पदाधिकारी उपस्थित होते.

