काही लोक निळवंडे धरणाचे श्रेय स्वतःच्या पदरात पाडून घेण्याचे प्रयत्न करतात — महसूल मंत्री विखे पाटील

निळवंडे धरणाच्या कालव्यांचे पाणी जानेवारी महिन्यात पंतप्रधानांच्या उपस्थितीत जिराईत भागाला देण्याचा शुभारंभ ! 

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची ग्वाही

प्रतिनिधी —

अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांनी केलेला त्याग आणि जेष्ठ नेते मधुकरराव पिचड यांनी यासाठी घेतलेल्या पुढाकारामुळेच निळवंडे धरणांचा ऐतिहासिक प्रकल्प पूर्णत्वास जात आहे. काही लोक निळवंडे धरणाचे श्रेय स्वतःच्या पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करतात अशी टीका करत जानेवारी महीन्यात एकाचवेळी तीनही कालव्यातून जिरायती भागाला पाणी देण्याचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत करू आशी ग्वाही महसूल पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

निळवंडे धरणातील पाण्याचे जलपूजन जेष्ठ नेते माजी मंत्री मधुकरराव पिचड आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यानिमित्ताने अकोले तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने विखे पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जेष्ठ नेते दशरथ सावंत, माजी आमदार वैभव पिचड, नगराध्यक्षा सोनाली नाईकवाडी, भाजपाचे तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे, जिल्हा सरचिटणीस जालिंदर वाकचौरे, बी.जे.देशमुख, सिताराम देशमुख, वसंतराव देशमुख, यशवंत आभाळे, गणेश कारखान्याचे चेअरमन मुंकूदराव सदाफळ, डॉ. विखे पाटील कारखान्याचे व्हा चेअरमन विश्वासराव कडू , रामभाऊ भुसाळ, सुनिल दातीर, राजेंद्र लहारे आदी उपस्थित होते.

अकोले तालुक्याच्या सर्वागीण विकासाचा आराखडा तयार करण्याच्या सूचना आपण जिल्हाधिकार्यांना दिल्या असून पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारचे सर्वतोपरी सहकार्य देण्याचे आश्वासन देतानाच मंत्री विखे पाटील म्हणाले की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पिचड साहेबांनी पुढाकार घेवून मुंबईत झालेल्या बैठकीत सर्व निर्णय झाल्यामुळेच मुखापासून कालव्याचे काम सुरू झाले. याकडे लक्ष वेधून विखे पाटील म्हणाले की काही लोक निळंवडे धरणाचे श्रेय स्वतःच्या पदरात पाडून घेण्यात धन्यता मानतात परंतू धरणाचे सर्व श्रेय हे मधुकरराव पिचड यांचे असून धरणासाठी त्याग केलेल्या शेतकऱ्यांचे असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.

 

मागील अडीच वर्षात आघाडी सतेत असलेल्या तीन पक्षाच्या सरकारने कोणताही प्रकल्प राज्याला दिला नाही. जिल्हयाला तीन मंत्री होते परंतू कोव्हीड संकटात तालुक्यात एकही फिरकला नाही. माझे कुटूंब तुमची जबाबदारी एवढेच म्हणून सरकार घरात बसले होते. महाराष्ट्राच्या मागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सारखा विश्वनेता उभा राहील्यामुळेच राज्याला मोफत लस आणि धान्य मिळाले यामुळे उपासमार टळली. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे देशाचा अर्थिक विकास दर वाढत असल्याने हे राज्य आणि देश खंबीरपणे वाटचाल करीत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

राज्यात शिंदें फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर जनतेला आपल्या मनातील सरकार आल्या सारखे वाटत आहेत. जनतेच्या हिताचेच निर्णय सरकार घेईल असे आश्वासन देवून विखे म्हणाले की, अतिवृष्टीमुळे नूकसान झालेल्या शेतकऱ्यांना ३हजार पाचशे कोटी रुपयांची मदत जाहीर केली. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांच्या अनुदानाची अंमलबजावणी या सरकारने केली असल्याची माहीती त्यांनी दिली.

लंपी आजारामुळे इतर राज्यात मोठ्या प्रमाणात जनावर दगावत आहेत मात्र राज्य सरकारने सर्व जनावरांचे मोफत लसीकरण करून दगावलेल्या जनावारांना मदत देण्याचाही निर्णय घेतला आहे. अकोले तालुक्यातील ४६ हजार जनावारांचे लसीकरण पूर्ण झाले असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी सर्वच निवडणुकीत शत प्रतशित भाजपा हे उद्दिष्ट ठेवून काम करण्याचे आवाहन करतानाच केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अगस्ती सहकारी साखर कारखान्याला मदत करण्याचे आश्वासनही दिले.

याप्रसंगी जेष्ठ नेते मधुकर पिचड दशरथ सावंत शिवाजी धुमाळ यांची यांची याप्रसंगी भाषणे झाली.

मंत्री विखे पाटील यांनी निळवंडे प्रकल्पावर जावून अधिकाऱ्यां समवेत बैठक घेवून कामाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. पिंपरकणे येथील मोठ्या पुलाची तसेच उच्चस्तरीय कालव्यांच्या कामाची पाहाणी त्यांनी केली. जलसंपदा विभामासह सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!