संकट काळातही महाविकास आघाडी सरकारचे मोठे काम — आमदार बाळासाहेब थोरात
मनभेद करणाऱ्यांना वेळीच त्यांची जागा दाखवा !

निळवंडे कालव्याने ऑक्टोबर मध्ये दुष्काळी भागाला पाणी मिळणार…
प्रतिनिधी —
जनतेचे प्रेम आणि नेतृत्वाचा विश्वास यामुळे अत्यंत अडचणीच्या काळात प्रदेशाध्यक्षपद सांभाळताना पक्षाला सन्मान मिळून देत महाविकास आघाडी सरकार राज्यात अस्तित्वात आले. कोरोना,चक्रीवादळ, अतिवृष्टी यासारख्या मोठ्या संकटातूनही शेतकऱ्यांना दोन लाख रुपये कर्जमाफीसह महाविकास आघाडी सरकारने पायाभूत विकासाचे अत्यंत चांगले निर्णय घेतले असून हे काम राज्यासाठी कायम स्मरणात राहणार असल्याचे प्रतिपादन काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले असून ऑक्टोबर मध्ये निळवंडे कालव्यांची कामे पूर्ण होऊन दुष्काळी भागात पाणी येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

वसंत लॉन्स येथे तालुक्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, बाजीराव खेमनर, सत्यजित तांबे, रणजितसिंह देशमुख, राजेंद्र नागवडे नगरचे शहराध्यक्ष किरण काळे, करण ससाने, सचिन गुजर, स्मितल वाबळे, हेमंत ओगले, डॉ. एकनाथ गोंदकर, बाबा ओहोळ, विश्वास मुर्तडक, डॉ. जयश्री थोरात, लक्ष्मण कुटे, लता डांगे, सुनंदा जोर्वेकर, अविनाश दंडवते आदी उपस्थित होते.

आमदार थोरात म्हणाले की, १९८५ पासून तालुक्याच्या विकासाची दिशा बदलली. प्रवरेच्या हक्काच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष करून ३० टक्के पाणी मिळवले. याचबरोबर दुष्काळी भागाला वरदान ठरणारे निळवंडे धरणाच्या कामाला १९९९ पासून राज्यमंत्रीपद मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने गती मिळाली. अनेक अडचणीवर मात करून हे धरण पूर्ण केले. स्व. विलासराव देशमुख यांच्या २ मिनिटांच्या मिटिंग मधून संगमनेर शहरासाठी अभूतपूर्व व ऐतिहासिक थेट पाईप लाईन योजना मंजुरीमुळे शहराला आज स्वच्छ व मुबलक पाणी मिळत आहे.

जनतेचे प्रेम आणि कॉंग्रेस नेतृत्वाचा मोठा विश्वास यामुळे सातत्याने विविध मंत्रिपदांवर काम करण्याची संधी मिळाली. मिळालेल्या प्रत्येक मंत्रीपदाला न्याय दिला. संगमनेर तालुक्याचा व जिल्ह्याचा लौकिक राज्यात वाढेल असे काम केले.
महाविकास आघाडी सरकार मध्ये महसूल मंत्री पदाच्या काळात ऑनलाईन सातबारा व आठ (अ) याचबरोबर तालुक्याच्या विकासासाठी सातत्याने मोठा निधी मिळविला. निळवंडे कालव्यांसाठी हजारो कोटी निधी मिळवला असून रात्रंदिवस काम प्रगतीपथावर सुरू आहे. ऑक्टोबर मध्ये दुष्काळी भागाला पाणी देणे हे आपले स्वप्न आहे. पाणी येणार आहे. कुणीही काळजी करू नये. निळवंडे धरण, कालवे, पाणी हे काम आपणच केले असून याची इतिहास नोंद घेईल. यासाठी अनेक वेळा संघर्ष करावा लागला हे सर्वश्रुत आहे. तर पाणीपुरवठा योजनांसाठी सुमारे ७०० कोटी, तालुक्यातील रस्त्यांच्या कामांसाठी मोठा निधी, शहरातील चौपदरीकरण विविध विकास कामांसाठी मोठा निधी मिळाला आहे.

सत्तेचा उपयोग हा गोरगरीब माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी केला आहे. पक्ष नेतृत्वाच्या विश्वासामुळे देश पातळीवर काम करण्याची संधी मिळाली. राज्यात महत्त्वाची जबाबदारी सांभाळत आहोत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे व्यक्तिमत्व सरळ आहे. त्यांनी अनेक वेळा विश्वास टाकला यातून महाविकास आघाडी सरकार मधून सर्वसामान्यांसाठी मोठे निर्णय घेता आले.

सत्ता येते जाते. जनतेची कामे करणे महत्त्वाचे असते. आगामी काळामध्ये प्रगतीपथावर असलेल्या सर्व सहकारी संस्थांची गौरवास्पद वाटचाल अशीच सुरू ठेवून सर्व निवडणुका एकजुटीने एकत्रित लढून मोठे यश संपादन करणे महत्त्वाचे आहे.
याकरता सर्वांनी एकत्रित रहावे आपल्यामध्ये मनभेद करणारे काही येतील. त्यांना वेळीच त्यांची जागा दाखवा. जिल्ह्यातही काँग्रेस पक्ष पूर्ण ताकतीने लढेल आणि जिंकेल याकरता आपण सर्वांनी कटिबद्ध राहावे असे आवाहनही त्यांनी केले.

आमदार डॉ. तांबे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारमध्ये माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडली. राज्यातील प्रमुख नेत्यांमध्ये त्यांचे नाव आहे. त्यांचा असलेला सन्मान हा संगमनेर तालुक्याचा आहे. यापुढील काळातही आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले पाहिजे. देशात सध्या धार्मिकतेच्या नावावर मनभेद केले जात आहे. विकास कामे सोडून धार्मिक मुद्दे जनतेपुढे आणले जात आहेत हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले. संगमनेर तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, काँग्रेस पक्ष, महाविकास आघाडी यांसह अहमदनगर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर शहराध्यक्ष विश्वासराव मुर्तडक यांनी आभार मानले.
