जेथे पाणी टंचाई असेल तेथे तातडीने पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या —       महसूल मंत्री थोरात

संगमनेर टंचाई आढावा बैठक संपन्न

प्रतिनिधी —  

या वर्षी कमी पर्जन्यमान झाले आहे. त्यामुळे काही गावांमध्ये पाण्याची कमतरता  भासत आहे. येणाऱ्या एक-दीड महिन्यात पाण्याची मागणी वाढणार आहे. त्यामुळे ज्या गावांची मागणी असेल त्या ठिकाणी अधिकारी पाठवून माहिती घेऊन तातडीने पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करून द्या. असे आदेश राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रशासनाला दिले आहेत.

संगमनेर उपविभागीय कार्यालय येथे झालेल्या टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी सभापती सुनंदा जोर्वेकर, उपसभापती नवनाथ अरगडे, जि. प. सदस्य अजय फटांगरे, भाऊसाहेब कुटे, महेंद्र गोडगे, सिताराम राऊत, मिलिंद कानवडे, पंचायत समिती सदस्य विष्णुपंत रहाटळ, किरण मिंडे, काशिनाथ गोंदे, शेतकी संघाचे चेअरमन संपत डोंगरे, अशोक सातपुते, बी. आर चकोर, दादासाहेब कुटे, युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाष सांगळे, युवक शहराध्यक्ष निखिल पापडेजा, आनंद वर्पे, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोरुळे, गटविकास अधिकारी अनिल नागणे, तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, राजेश तिटमे अदींसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

थोरात म्हणाले की, काही वर्षांपूर्वी शंभर टँकरची मागणी या तालुक्यात होत होती. अशा कठीण परिस्थितीतून अत्यंत चांगल्या पद्धतीने दुष्काळी परिस्थिती हाताळली. यावर्षी कमी पाऊस झाल्याने काही गावांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते. त्यामुळे ज्या ठिकाणी मागणी असेल त्या ठिकाणी तातडीने अधिकारी पाठवून पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करून द्या. तसेच ज्या गावांमध्ये रोजगार हमीच्या कामांची मागणी असेल आणि २० मजूर कामावर येण्यास तयार असतील तेथेही तातडीने रोजगार हमीचे कामे सुरू करा.असे आदेश प्रशासनाला दिले आहेत. तसेच तालुक्यात तलाव दुरुस्तीसाठी मोठा निधी आला असून गावगावच्या पदाधिकाऱ्यांनी तलाव दुरुस्तीचे कामे चांगली करून घ्या. असेही सांगितले.

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी विभागनिहाय खरीप आढावा बैठक घेण्याची परंपरा सुरू केली. आपण कृषिमंत्री असताना महाराष्ट्रातील प्रत्येक विभागात खरीप आढावा बैठक घेऊन काम केले. सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. तसेच महाराष्ट्र सरकारने लोडशेडिंगचे संकट टाळण्यासाठी वीज खरेदी केली असल्याचे ते म्हणाले.

तहसीलदार अमोल निकम यांनी प्रास्ताविक केले. तर गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी आभार मानले.

 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!