वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या – आमदार अमोल खताळ
निवृत्तीनाथ पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांना सूचना – सुविधांचा घेतला आढावा
संगमनेर / प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर जाणाऱ्या संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये तसेच त्यांना कोणताही त्रास होणार नाही यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून आवश्यक ती दक्षता घ्यावी, अशा स्पष्ट सूचना आमदार अमोल खताळ यांनी दिल्या आहेत.

तालुक्यातील पारेगाव बुद्रुक येथील हनुमान मंदिरात पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पारेगाव बु. ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आमदार खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी पालखी मार्गावरील सुविधा, सुरक्षा व्यवस्था, आरोग्य सेवा, पिण्याचे पाणी, स्वच्छता, वाहतूक नियंत्रण यांसह इतर आवश्यक उपाययोजनांचा अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. यावेळी संगमनेर उपविभागाचे प्रांताधिकारी अरुण उंडे, तहसीलदार धीरज मांजरे, गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास वर्पे, सहाय्यक गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर, प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी कामेश तावरे, पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंके, भीमराज चत्तर, एकनाथ मुंगसे, विठ्ठल घोरपडे, राजेंद्र सोनवणे, संपत फड, श्रीकांत गोमासे, किसन चत्तर, डॉ. संतोष डांगे, दत्तात्रय दिघे, सुरेश दळवी, रावसाहेब गडाख, किशोर गडाख, बाबासाहेब गोर्डे, पुंजाहरी गडाख, सुनील वाकचौरे, भीमराज गडाख, मधुकर गडाख, सूर्यभान गडाख, सुभाष गडाख, आकाश गडाख, अनिकेत गाडेकर, राजेंद्र गुंजाळ, निलेश गडाख यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

आमदार खताळ म्हणाले की, पालखी सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. या निधीचा योग्य वापर करून पालखी मार्गावरील सर्व आवश्यक कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत. वारकऱ्यांना मुक्काम, पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, स्वच्छतागृहे आणि सुरक्षित प्रवास यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांनी कटिबद्ध राहावे, अशा सूचना देखील आमदार अमोल खताळ यांनी दिल्या. यावेळी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे यांनी दिली. सूत्रसंचालन रावसाहेब गडाख यांनी केले. प्रस्ताविका आणि स्वागत सुरेश दळवी यांनी केले. तर आभार कैलास गोर्डे यांनी मानले
