अहिल्यानगर जिल्ह्यातील जलजीवन मिशनचे काम रखडले !
पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
अहिल्या नगर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये जलजीवन मिशनच्या योजना मंजूर झालेल्या आहेत. या योजनांचे काम देखील सुरू आहे. मात्र काही कामे ही रखडलेले असून काही कामांचा दर्जा आणि कार्य पूर्ततेबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
बऱ्याच ठिकाणी पाण्याचे स्रोत निश्चित न झाल्यामुळे तलावांचे काम रखडले आहे. हे स्रोत निश्चित नसल्यामुळे तलावांचे काम सुरूच होऊ शकलेले नाही. अनेक ठिकाणी पाईपलाईनचे काम रखडलेले आहे. यावर कळस म्हणजे काही ठिकाणी तर कामाची वर्क ऑर्डर दिल्यानंतरही प्रत्यक्ष काम सुरू झालेलं नाही.

त्यामुळे संपूर्ण जलजीवन मिशनच्या कामाबाबत नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. नगर जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी पाणीटंचाई आहे. टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे या मूलभूत गरजेशी संबंधित असलेली योजनेची कामे तात्काळ पूर्ण करावीत. जी कामे सुरू नाही ती सुरू करावीत. नियमाप्रमाणे सुरुवात आणि चांगल्या पद्धतीने पूर्ण व्हावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहेत.
दरम्यान पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी यासंदर्भात बैठक घेतली असून प्रभावी अंबावलबजावणी करून काम पूर्णत्वाकडे न्यावे असे निर्देश दिले आहेत. या बैठकीमध्ये आमदार सत्यजित तांबे देखील सहभागी झाले होते.
