खर्डा येथील मदारी बांधवांना मिळणार आता हक्काची पक्की घरे
20 लाभार्थ्यांच्या वसाहतीसाठी रू 1 कोटी 35 लाख 34 हजार 230 इतक्या खर्चास मान्यता
महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या पाठपुराव्यास यश
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क मुंबई
अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील मौजे खर्डा येथील यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत मदारी वसाहत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 20 लाभार्थ्यांच्या वसाहतीकरीता रू. 1 कोटी 35 लाख 34 हजार 230 इतक्या सुधारित अंदाजपत्रकास शासन मान्यता प्राप्त झाली आहे.

या आधी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजने अंतर्गत दिनांक 06.02.2018 रोजीच्या शासन ज्ञापनान्वये मौजे खर्डा येथील 20 लाभार्थ्यांच्या वसाहतीकरीता रु. 88 लाख 10 हजार 223 इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली होती . आता रू. 1 कोटी 35 लाख 34 हजार 230 इतक्या सुधारित अंदाजपत्रकास शासन मान्यता व उर्वरित आवश्यक असलेला रु. 47 लाख 24 हजार इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे हे अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना महाराष्ट्र राज्यात अशाप्रकारे वसाहत तयार करण्याचा पहिला प्रयोग राबविण्यात आला होता. परंतु या वसाहती मधील गोर गरीब लोकांच्या घरांची कामे अपूर्ण होती तसेच तेथे पायाभूत सुविधांसाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता होती. त्यामुळे या विषयासंदर्भात दिनांक 17 फेब्रुवारी 2025 रोजी विधानभवन, मुंबई येथे विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीस मंत्री अतुल सावे, इतर मागासबहुजन कल्याण विभागाचे संचालक, प्रादेशिक उपसंचालक, सहाय्यक संचालक, खर्डा ग्रामपंचायतीच्या सरपंच, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व खर्डा येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
या वसाहतीचे काम उत्कृष्ट पद्धतीने व तातडीने पूर्ण करण्याकरीता महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे खर्डा गावातील मदारी वसाहतीचे काम पूर्ण करन्याचे काम मार्गी लागले आहे.
या मान्यतेमुळे या ठिकाणच्या नागरिकांना याचा लाभ होणार असून या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे . ग्रामस्थांनी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा राम शिंदे यांचे आभार मानले आहेत
