नव्या लोकप्रतिनिधीने कोणाच्या तरी सांगण्यावरून हत्यार होऊ नये —
निळवंडेसाठी कोणतेही योगदान नसणारे आता जलदूत व्हायला निघाले – माजी मंत्री बाळासाहेब थोरात
तालुक्याची व्यवस्था बिघडवणाऱ्यांचा बंदोबस्त करा –
संगमनेर प्रतिनिधी दिनांक 15
एकेकाळी दुष्काळी तालुका ही ओळख होती. मोठ्या कष्टातून आणि संघर्षातून आणि चाळीस वर्षात एकही दिवस सुट्टी न घेता अविश्रांत कामातून समृद्ध आणि वैभवशाली संगमनेर तालुका उभा केला आहे. चाळीस वर्षे शांत आणि विकासाची वाटचाल करणाऱ्या तालुक्यात सध्या काय सुरू आहे याचा प्रत्येकाने विचार करा. तालुक्याची शांतता बिघडवणाऱ्यांचा वेळीच बंदोबस्त करा असे आवाहन करताना तालुक्याला कष्टाचा व संघर्षाचा इतिहास आहे. तो विसरु नका. निळवंडे धरणासाठी ज्यांचे कोणतेही योगदान नाही ते आता जलदूत व्हायला निघाले असल्याची टीका माजी मंत्री – थोरात कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या 58 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, बाजीराव खेमनर, ॲड.माधवराव कानवडे, दुर्गाताई तांबे, व्हा.चेअरमन पांडुरंग घुले, रणजितसिंह देशमुख, लक्ष्मणराव कुटे, संपतराव डोंगरे, शंकरराव खेमनर, आर.बी.रहाणे, लहान भाऊ गुंजाळ, इंद्रजीत थोरात, गणपतराव सांगळे, डॉ.जयश्री थोरात, अजय फटांगरे, कारखान्याचे संचालक संतोष हासे, इंद्रजीत खेमनर, संपतराव गोडगे, तुषार दिघे, विनोद हासे, सतीश वर्पे, रामदास धुळगंड, विलास शिंदे,रामनाथ कुटे, नवनाथ आरगडे, विजय राहणे, गुलाब देशमुख, अरुण वाकचौरे,योगेश भालेराव, अंकुश ताजने, दिलीप नागरे, लताताई गायकर, सुंदराबाई डूबे, बंडू नाना भाबड, मदन आंबरे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, किरण कानवडे आदी उपस्थित होते.
थोरात म्हणाले की, कारखान्याची 58 वर्षाची वाटचाल ही कौतुकास्पद राहिली आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी माळरानावर सुरू केलेल्या या कारखान्यासाठी डॉ.अण्णासाहेब शिंदे, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक व मान्यवरांची मोठी मदत झाली. ८०० मे.टना पासून सुरू झालेल्या या कारखान्याने 5500 मे.टन क्षमता व 30 मेगा वॅट वीज निर्मिती सुरू केली. आज आदर्शवत पद्धतीने काम सुरू असून प्रत्येक शेतकऱ्याने एकरी 100 टन उत्पादन काढले पाहिजे.
दुष्काळी तालुका ही संगमनेरची ओळख होती. पाणी चोर म्हणून हिनवले जायचे. सहकारमहर्षी दादांच्या नेतृत्वाखाली मधुकरराव पिचड व आपण पाणी प्रश्नासाठी मोठा संघर्ष केला आणि 30% हक्काचे पाणी मिळवले त्यातून पाईपलाईनचे जाळे निर्माण झाले आणि शेती फुलली. दुष्काळी भागाला पाणी मिळावे याकरता निळवंडे धरण हे स्वप्न होते. अनेक अडचणींवर मात करून आपण निळवंडे धरण पूर्ण केले. प्रकल्पग्रस्तांना तालुक्यात जमिनी दिल्या. सहकारी संस्थांमध्ये नोकरी दिल्या.आदर्शवत पुनर्वसन केले त्यावेळी कुणीही मदत केली नाही.निळवंडे होणार नाही अशा अफवा निर्माण केल्या. मोठ्या कष्टातून निळवंडे धरण व कालवे पूर्ण केले ज्यांनी या कामात कोणतीही योगदान दिले नाही ते आता जलदूत व्हायला निघाले आहेत.
40 वर्षात एकही सुट्टी न घेता तालुक्याचा सर्वांगीण विकास केला. निळवंडे धरण,कालवे, बायपास,विविध रस्ते, वैभवशाली इमारती, शहरासाठी स्वतंत्र पाईपलाईन योजना,गावोगावी विकास कामे, बंधाऱ्यांचे जाळे, पाणीपुरवठा योजना, आरोग्य, शिक्षण, सहकार, शिक्षण ग्रामीण विकास या सर्व क्षेत्रांमध्ये आपला लौकिक निर्माण झाला आहे. हे काम एका दिवसात झाले नाही. त्यासाठी कष्ट करावे लागले रक्त आटवावे लागले. आज देशात कुठेही गेले तरी अभिमानाने संगमनेरचा उल्लेख होतो. राज्यातही कायम आपला आदर केला जातो. विधानसभा निवडणुकीच्या बाबत अजूनही कुणाला विश्वास नाही अशी परिस्थिती आहे. तालुका शांततेने प्रेमाने परिवार म्हणून आपण सांभाळला. मात्र हा विकास काही लोकांना पाहवत नाही येथे अशांतता निर्माण केली जात आहे. खोट्या केसेस टाकल्या जात आहेत. हे काय सुरू आहे असा सवाल करताना नवीन लोकप्रतिनिधी कामाला संधी आहे ते काम करावे तालुक्याची आदर्श परंपरा बिघडू नये किंवा कुणाच्या सांगण्यावरून हत्यार होऊ नये असे सांगताना मोठ्या कष्टातून हा तालुका उभा झाला आहे. संघर्षाचा इतिहास आहे हा कोणी विसरू नका.आपली चांगल्या राजकारणाची विकासाची परंपरा जपण्यासाठी सर्वांनी भक्कमपणे पाठीशी उभे रहा असे आवाहन त्यांनी केले.
तर मा.आ.डॉ.तांबे म्हणाले की, माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संघर्षातून संगमनेर तालुक्याला 30 टक्के हक्काचे पाणी मिळाले त्यांनीच निळवंडे धरण पूर्ण केले. निळवंडे धरणाचे पाणी 40% संगमनेर तालुक्याला मिळत आहे. मोठे काम त्यांनी उभे केले आहे कामातून तालुक्याचा राज्यात लौकिक निर्माण केला आज संगमनेर मॉडेल हे देशभर आदर्शवत म्हणून पाहिले जात आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील सहकारी चळवळीला दिशा देण्यासाठी काम करावे असे नेतृत्व त्यांचे असल्याचे ते म्हणाले.
या वार्षिक सर्वसाधारण सभेचे स्वागत व्हा.चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी केले नोटीस वाचन कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर इंद्रजीत थोरात यांनी आभार मानले. यावेळी तालुक्यातील सभासद,शेतकरी, ऊस उत्पादक, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी एकरी जास्तीत जास्त ऊस उत्पादन करणाऱ्या शेतकरी बांधवांचा कारखान्याच्या वतीने सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.