भोजापुर चारी आम्ही केली, तुमचे योगदान काय – माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचा सवाल
तुमच्याकडेही 35 वर्षे खासदारकी होती, चारीचा एक खडा तरी उचलला गेला का ?
खोट्यानाट्या गोष्टी सांगून क्रेडिट का घेता ?
संगमनेर प्रतिनिधी दिनांक 15
दुष्काळी भागाला पाणी मिळावे याकरता सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून कारखान्याच्या माध्यमातून भोजापुर चारीचे काम पूर्ण केले. कारखान्याने या कामासाठी 80 लाख रुपयांचा निधी खर्च केला तसेच आपण जलसंधारण मंत्री असताना वेळोवेळी निधी मिळवला.चारीचे काम पूर्ण झालेले होते. चारी आम्हीच केलेली आहे. सुदैवाने मे महिन्यात चांगला पाऊस झाला आणि पाणी आले त्यात तुमचे योगदान काय ? आयत्या पिठावर रेघोट्या ओढता. काम न करता खोट्यानाट्या गोष्टी सांगून क्रेडिट का घेता असा थेट सवाल माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधकांना केला आहे.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या 58 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजि आमदार डॉ.सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, बाजीराव खेमनर, दुर्गाताई तांबे, ॲड.माधवराव कानवडे, रणजितसिंह देशमुख, डॉ. जयश्री थोरात, व्हा.चेअरमन पांडुरंग पा.घुले, इंद्रजीत थोरात, संपतराव डोंगरे, शंकरराव खेमनर आदी उपस्थित होते.
थोरात म्हणाले की, दुष्काळी भागाला पाणी मिळावे याकरता कारखान्याच्या मदतीने भोजापुर चारी केली गेली. त्यावेळी संगमनेर व प्रवरा कारखान्याच्या माध्यमातून ही चारी करायची होती. पूर्वेच्या लोकांनी याकडे पाहिले सुद्धा नाही. आपल्या कारखान्याने ८० लाख रुपये खर्च केला. चारी तयार झाली आपण जलसंधारणमंत्री झाल्यानंतर वेळोवेळी निधी मिळवला. चारी तिगाव माथ्यापर्यंत नेली. महाविकास आघाडी काळामध्ये शंकराव गडाख जलसंधारण मंत्री असताना पुन्हा दोन कोटी बारा लाख रुपयांचा निधी मिळवला. चारी पूर्ण तयार केली. पावसाळ्यामध्ये दरवर्षी चारीची देखभाल दुरुस्ती कारखान्याने केली. पाणी आधी देवकवठ्यापर्यंत पोहोचले. ही चारी काही आठ महिन्यांमध्ये झाली नाही. यासाठी काम करावे लागले.
तुमच्याकडेही 35 वर्षे खासदारकी होती. तुमच्याकडून या चारीचा एक खडा तरी उचलला गेला का असा सवाल करताना खोट्या नाट्या गोष्टीं सांगून क्रेडिट घेऊ नका असे सुनावले तर सुदैवाने यावर्षी मे महिन्यातच पाऊस चांगला झाला. पाऊस चांगला असल्याने सिन्नर तालुक्याला पाण्याची कमी गरज होती.पाणी लवकर आले आम्हाला त्याचा आनंद आहे. पण ही चारी काही आठ महिन्यात झाली नाही तर त्यासाठी आम्ही कष्ट केलेत. भोजापुर चारी आम्ही केली असे सांगताना निळवंडे कालव्यावरून नान्नज दुमाला व वरील गावांसाठी तीन पाणीपुरवठा योजना मंजूर केल्या होत्या. त्या कुणी रद्द केल्या असा सवाल त्यांनी विचारला. याचबरोबर तालुक्यातील विविध रस्त्यांसाठी दीडशे कोटी रुपयांचा निधी मिळवला होता. या रस्त्यांच्या कामाला स्थगिती दिली. यातील 40 कोटींचा निधी हा दुसऱ्या तालुक्यात नेला गेला हे कसे काय झाले ?
नान्नज दुमाला व परिसरासाठीच्या 3 पाणीपुरवठा योजना का रद्द केल्या ?
तालुक्यातील प्रत्येक गावाला व शेतकऱ्याला पाणी देण्यासाठी आपण सातत्याने काम केले. पुढील काळातही निळवंडे कालव्याचे पाणी सर्व शेतकऱ्यांना शेततळ्यामधून वर्षातून तीनदा तरी देता येईल असे नियोजन आपण केले होते. नान्नज दुमाला, निमोण या परिसराला पाणी देण्याकरता तीन उपसा सिंचन योजना आपण मंजूर करून ठेवल्या होत्या. मात्र सरकार बदलले आणि त्यांनी या योजना रद्द केल्या. या योजना का रद्द केल्या असा सवाल विचारताना त्यांनी सुडाचे राजकारण सुरू केले आहे. अनेकांवर खोटे गुन्हे टाकले जात आहेत. त्यामुळे तालुक्याच्या विकासाची वाटचाल कायम ठेवण्यासाठी सर्वांनी संघटित होऊन एकजुटीने मुकाबला करा असे आवाहन त्यांनी केले.