स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांच्या स्मृतीला उजाळा देण्याचा दिवस — आमदार अमोल खताळ
बीजे खताळ विद्यालयामध्ये स्वातंत्र्य दिनाचा उत्सव
संगमनेर प्रतिनिधी दिनांक 16 —
स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व फक्त ध्वजारोहणापुरते न राहता ज्या महापुरुषांनी ब्रिटिशांबरोबर लढून आपल्या देशाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळवुन दिले त्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या सर्व स्वातंत्र्यवीरांचे स्मरण करून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्याचा हा दिवस असल्याचे प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी कले आहे.


संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथील बी जे खताळ जनता विद्यालया मध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्ताने आमदार खताळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वकील विजय खताळ यांनी भूषविले. मुरलीधर खताळ, सरपंच लता खताळ, अनिल खताळ, मिलिंद खताळ यांच्यासह ग्रामस्थ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार खताळ म्हणाले की, शाळेतील मुलांमध्ये देशभक्ती जागृत करण्याचे काम स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी होत असते. त्यांनी आपल्या देशाप्रती व्यक्त केलेल्या भावनां मधून त्यांचा आत्त्मविश्वास अधिकच दृढ झाला आहे. निश्चितच देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान देत क्रांतीच्या मार्गाने लढा देत स्वातंत्र्य मिळून दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जवानांचे मनोधैर्य वाढविण्याचे काम केले आहे.

भारताला स्वातंत्र्य मिळाले असले तरी अजूनही देशांतर्गत कुरघुड्या चालू आहेत तुम्हाला आम्हाला देशप्रेमी म्हणून देशभक्त म्हणून पुढे यावा लागेल. आत्ताच काही दिवसां पूर्वी पेहलगाममध्ये दहशतवाद्यांकडून भारतीय पर्यटकांवर हल्ला झाला. त्या हल्ल्याला भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जशास तसे चोख उत्तर दिले.
यावेळी विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी परेड करून सलामी दिली. तसेच प्राथमिकशाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर करून ग्रामस्थांची मने जिंकून घेतली. विद्यार्थ्यांनी यावेळी भाषणे केली. दहावीच्या शालांत परीक्षेत गुणवंत ठरलेल्या तीन विद्यार्थिनींचा तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचाही आमदार खताळ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला
