युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज जगाचे प्रेरणास्थान – माजीमंत्री बाळासाहेब थोरात
संगमनेरमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी
संगमनेर प्रतिनिधी दि. – 19
समाजातील सर्व घटकांना बरोबर घेत सर्वांच्या प्रगतीसाठी कार्य करणारे तसेच लोकशाहीचा पाया घालून संपूर्ण जगाला सर्वधर्मसमभावाची शिकवण देणारे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे जगाचे प्रेरणास्थान असल्याचे अभिवादन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी महसूल व कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केले. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजीत तांबे, युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, माजी शहराध्यक्ष विश्वासराव मुर्तडक, गणेश मादास, नितीन अभंग, सतीश आहेर, सुरेश झावरे, जीवन पांचारीया, धीरज टाक, डॉ.सुचित गांधी, आलोक बर्डे, खंडू सातपुते, अंबादास आडेप, सचिन करपे, अमित गुंजाळ, अण्णा शेलकर, धीरज देशमुख, व्यंकटेश देशमुख, ऋतिक राऊत यांसह विविध कार्यकर्ते उपस्थित होते.

थोरात म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वधर्म समभाव,लोकशाही, गरिबांचे कल्याण ही शिकवण दिली. समाजातील अठरापगड जाती-जमातींना बरोबर घेऊन स्वराज्य उभारले. स्वाभिमानाची शिकवण दिली. बलाढ्य शक्ती विरुद्ध लढताना स्वराज्यातील गोरगरिबांच्या हिताचे रक्षण केले. त्यांचा वारसा घेऊन प्रत्येकाने काम केले पाहिजे. मानवता हा धर्म जो महाराजांनी व संतांनी सांगितला तो आपण सर्वांनी पुढे नेण्यासाठी सदैव कटिबद्ध राहिले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.

डॉ. तांबे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड भारतीयांचे आराध्य दैवत स्वराज्यातील प्रत्येक नागरिकाच्या व्यक्ती स्वातंत्र्याची काळजी त्यांनी घेतली. धाडसी पराक्रमी याचबरोबर दूरदृष्टीचे अनेक नेतृत्व गुण असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज हे युवा पिढीसाठी सदैव मार्गदर्शक आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र अभ्यासले जात असून ते सर्वांसाठी स्फूर्तीदायी आहे. त्याचा अभिमान प्रत्येकाने बाळगले पाहिजे. असेही ते म्हणाले.

डॉ.जयश्री थोरात म्हणाल्या की, महाराष्ट्रातील प्रत्येकासाठी छत्रपती शिवाजी महाराज दैवत आहे. लोककल्याणकारी शासन व्यवस्था त्यांनी निर्माण केली. स्वराज्यातील आणि परराज्यातील सर्वसामान्यांचा त्यांनी आदर सन्मान केला. धर्मग्रंथ, धर्मस्थळ, स्त्रिया, लहान मुलं यांचा सर्वांनी सन्मान करावा असा नियम केला. शिवाजी महाराजांचे चरित्र प्रत्येकाला जीवन जगताना मोठी स्फूर्ती देत असून मार्ग दाखवत असल्याचेही त्या म्हणाल्या.
