दृष्ट प्रवृत्तीला रोखण्यासाठीच प्रभावती घोगरे यांची उमेदवारी – आमदार बाळासाहेब थोरात 

दहशतमुक्त वातावरण व स्वातंत्र्यासाठी घोगरे यांच्या पाठीशी उभे रहा

प्रतिनिधी —

शिर्डी मतदारसंघांमध्ये गेली अनेक वर्ष विविध सत्ता असूनही विकास पूर्णपणे रखडला आहे. येथील दहशतीचे वातावरण संपविण्याबरोबर स्वातंत्र्य बंधुभाव व निर्मळ वातावरण निर्माण करण्यासाठी सर्वांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे असून दृष्ट प्रवृत्ती रोखण्यासाठीच प्रभावती घोगरे यांची उमेदवारी असल्याचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे.

कोल्हार बुद्रुक येथे भगवती माता मंदिराच्या प्रांगणात प्रचार शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर उमेदवार प्रभावती घोगरे, करण ससाणे, सचिन कोते, रिपाईचे नेते बाळासाहेब गायकवाड, पंकज लोंढे, किरण कडू, सचिन चौगुले, राजेंद्र अग्रवाल, संजय शिंदे, लताताई डांगे, सोमनाथ गोरे, शितल लहारे, सुधीर म्हस्के, विजय दंडवते, राजेंद्र निर्मळ उपस्थित होते.

आमदार थोरात पुढे म्हणाले की, या मतदारसंघात खासदार, आमदार, मंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष पद अशी अनेक वर्ष सत्ता असूनही विकास कामे रखडली आहेत. गचक्यांचा रस्ता म्हणून प्रसिद्ध असलेला नगर मनमाड रस्ता यांना दुरुस्त करता आला नाही. साठ वर्षात एमआयडीसी बद्दल काहीच बोलले नाही. निवडणूक आली म्हणून एमआयडीसीच्या गप्पा सुरू झाल्या आहेत. या परिसरातील वातावरण कायमच दहशतीखाली असते. ही दहशत मोडून काढण्यासाठी महाविकास आघाडीने प्रभावती घोगरे यांना उमेदवारी दिली आहे.

गणेश कारखान्याची परिस्थिती अतिशय वाईट करून ठेवली होती. परंतु सभासदांनी कारखाना आमच्या ताब्यात दिल्यानंतर अतिशय सुंदरपणे कारखाना चालवला. शेतकऱ्यांचे पेमेंट कामगारांचे पगार सर्व दिले. म्हणून गणेश परिसरात दिवाळी आनंदाची गेली.

या भागातील नेते संगमनेरला येऊन अतिशय खालच्या स्तरावर जाऊन टीका करतात. धांदरफळ मध्ये तर थेट महिलांचा अपमान करण्यापर्यंत त्यांचे धाडस झाले. म्हणून गावातील महिलांनी सभा उधळून लावली. यांना पळता भुई थोडी झाली. यांचा सहवास लाभला की दृष्ट बुद्धी सुचते. आणि त्यातूनच देशमुख हा दृष्ट बुद्धीने बोलला व तालुक्यात मोठा उद्रेक झाला.

गणेश, राहुरी कारखाना, सहकारी दूध संघ हे बंद पडण्याचे काम यांनी केले. संगमनेर तालुक्यात येऊन जाती-धर्माचे राजकारण करून संगमनेरची शांतता भंग करण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु संगमनेर तालुका अशा प्रवृत्तीला कधीही थारा देत नाही. म्हणूनच आजच्या स्थितीला तालुक्यात आठ हजार कोटीच्या ठेवी आहेत. बाजारपेठ फुललेली असते. ही प्रगती या नेत्यांना पाहवत नसल्याने संगमनेरला येऊन म्हणाली की, अमृतवाहिनी शाखा का काढली, मी त्यांना ठामपणे सांगतो की या भागातील लोकांना न्याय देण्यासाठीच ही शाखा काढण्यात आली आहे.

मी महसूल मंत्री असताना आमदार ससाणे यांना बरोबर घेऊन श्रीरामपूरचा खंडकरी प्रश्न मार्गी लावला. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या व खंडकऱ्यांच्या हिताचेच निर्णय घेतले गेले. निळवंडे धरणाचे काम करत असताना धरणग्रस्तांसाठी प्रसंगी स्वतःची जमीन दिली. येथील नेत्यांनी कायम धरणाच्या कामात अडचणी निर्माण करण्याचे काम केले. हे महसूल मंत्री असताना सध्याचे वाळू धोरण पूर्णपणे फसले आहे. ग्रामीण भागात लोकांना घर बांधण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. हा प्रश्न मी अनेक वेळा विधानसभेत विचारला तर त्याला उत्तरही दिले नाही.

प्रभावती घोगरे म्हणाल्या की, माझे वडील राजकारणात असल्यामुळे मला राजकारणाचा वारसा आहे. शिर्डी मतदारसंघाची दहशत संपवण्यासाठी मी शपथ घेतली आहे. मला उमेदवारी मिळू नये म्हणून अनेक प्रयत्न केले गेले. परंतु आमदार बाळासाहेब थोरात हे माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याने मला उमेदवारी मिळाली. शिर्डी मतदारसंघांमध्ये अनेक विकास कामे प्रलंबित आहेत ती पूर्ण करण्यासाठी माझी उमेदवारी आहे. गेली 35 वर्ष तुम्ही जे केले नाही ते मी पाच वर्षात करणार आहे आणि शिर्डी मतदार संघाला भयमुक्त करण्याचा संकल्प मी केला आहे.

याप्रसंगी बाळासाहेब गायकवाड, करण ससाणे, सुरेंद्र खर्डे, सचिन चौगुले, आदींसह विविध नेत्यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी कोल्हार व परिसरातील नागरिक युवक महिला व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

Oplus_131072

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!