निळवंडेच्या कालव्यातून दुष्काळग्रस्त भागाला तातडीने पाणी सोडा – आमदार बाळासाहेब  थोरात

डाव्या व उजव्या कालव्यातून पाणी सोडून बंधारे भरू द्या

प्रतिनिधी —

अहमदनगर जिल्ह्याला वरदान असलेले भंडारदरा व निळवंडे धरण भरले असून निळवंडे धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून ओहरफ्लोचे पाणी तातडीने दुष्काळग्रस्त भागाला सोडून जिरायत भागातील सर्व बंधारे भरू द्यावेत अशी मागणी आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

आमदार बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे की, निळवंडे धरण हे दुष्काळी भागातील 182 गावांसाठी निर्माण केले असून या भागाला हे धरण वरदान ठरणारे आहे. मागील आठवड्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने भंडारदरा व निळवंडे धरण ओव्हरफ्लो झाले आहे. असे असले तरी निळवंडे च्या लाभ क्षेत्रात मात्र अत्यंत कमी पाऊस झाला असल्याने  लाभक्षेत्रातील सर्व ओढे नाले कोरडेठाक आहेत. संगमनेर तालुका हा पर्जन्यछायेत असून येथे अत्यंत कमी पाऊस झाला आहे .तसेच तळेगाव सह दुष्काळी पट्ट्यातील अनेक गावांमध्ये पाण्याची मोठी टंचाई आहे .

निळवंडे धरण ओव्हरफ्लो झाल्याने ते अतिरिक्त पाणी दुष्काळी भागाला प्राधान्याने दिले गेले पाहिजे. लाभ क्षेत्रात कमी झालेला पाऊस, पाण्याची टंचाई यामुळे या नागरिकांना व शेतकऱ्यांना दिलासा मिळावा याकरता सरकारने तातडीने निळवंडे धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्यातून पाणी सोडून जिरायत भागातील सर्व पाझर तलाव व बंधारे तातडीने भरू द्यावेत.

संगमनेर तालुक्यासह उत्तर नगर जिल्हा हा पर्जन्यछायेत असून ऐन पावसाळ्यात सुद्धा अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे .याचबरोबर पिण्याच्या पाण्यासह पशुधन वाचवणे हे देखील जिकरीचे झाले आहे.पावसाची अशाश्वती आणि पुढील काळातील नियोजन याकरता निळवंडे कालव्याच्या मधून येणाऱ्या ओहरफ्लो च्या पाण्यातून संगमनेर, राहता, कोपरगाव,  राहुरी या तालुक्यातील निळवंडे धरणाच्या लाभ क्षेत्रातील शेतकरी व नागरिकांना भविष्यातील समस्यांमधून काहीसा दिलासा मिळणार आहे.

तरी प्रशासनाने कोणताही वेळ वाया न घालवता तातडीने डाव्या आणि उजव्या कालव्याला पाणी सोडून दुष्काळी भागातील सर्व बंधारे, पाझर तलाव भरू द्यावेत अशी मागणी आमदार थोरात यांनी केली आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!