विखे – काळे – कोल्हे….. एकमेकांच्या जिरवा जिरवीमुळे माझीही जिरली — माजी खासदार लोखंडे
प्रतिनिधी —
नगर जिल्ह्यातील शिर्डी आणि अहमदनगर दक्षिण या दोन्ही लोकसभा मतदारसंघात भाजपचा पराभव झाला आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे हे विजयी झाले आहेत तर नगर दक्षिण मध्ये अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या आणि बडे राजकीय घराणे असलेल्या विखे पाटील परिवाराचे डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा पराभव राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे निलेश लंके यांनी केला.
दोन्हीकडे हे मोठी धक्के असताना जिल्ह्यात भाजपला पूर्णपणे अपयश आल्याचे उघड झाले. मात्र भाजपमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी उघड केले आहे. उत्तर नगर जिल्ह्यातील नेते काळे – कोल्हे आणि विखे पाटील यांनी एकमेकांची जिरवा जिरवी करताना माझी मात्र जिरली आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे मंत्री झाल्यापासून जिल्ह्यातील त्यांच्या विरोधी नेत्यांना त्रास देत असल्याचे आरोप वेळोवेळी झाले. पक्षांतर्गत देखील त्यांच्याविषयी नाराजी होती. मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी देखील जिल्ह्यातील भाजपचे उमेदवार पराभूत होण्यात विखे पाटलांचा छुपा सहभाग होता असे आरोप त्यांच्यावर या नेतेमंडळींकडून करण्यात आले होते. याच याबाबत थेट माध्यमातून चर्चा उघड झाली होती. आणि वरिष्ठांकडे तक्रार केली असे देखील समोर आले होते. विखे पाटील यांचा प्रत्येक तालुक्यातील राजकीय हस्तक्षेप हा वादग्रस्त विषय आहे.
प्रत्येक निवडणुकीत विखे पाटील यांचा तेथील नेत्यांना त्रास होत असतो असे सांगितले जाते. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत देखील विखे – काळे – कोल्हे यांच्या एकमेकांतील पारंपारिक विरोधामुळे शिवसेना (शिंदे गट, भाजपचे) उमेदवार सदाशिव लोखंडे यांना पराभव पराभवाला सामोरे जावे लागले आहे असे लोखंडे यांच्या प्रतिक्रियांमधून उघड झाले आहे. त्यामुळे “हम तो डूबेंगे सनम….. असा प्रकार या जिल्ह्यात झाला आहे. तर दुसरीकडे दक्षिणेत विखे पाटलांची देखील जिरली. यातून नेमके काय साध्य झाले असा सवालही माजी खासदार लोखंडे यांनी उपस्थित केला.