कळसुबाई – हरिश्चंद्रगड अभयारण्यात बिबट्यासह, सांबर, भेकर आणि रानडूकरांची संख्या वाढली !
प्रतिनिधी —
कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात बिबट्यासह, सांबर, भेकर आणि रानडूकरांची संख्या वाढली आहे. मात्र मागील वर्षी पाऊस चांगला झाल्याने जंगलात पाणीसाठे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्याने गणनेसाठी सर्वच प्राणी पानवठ्यांवर पाहण्यास मिळाले नाहीत. असे असले तरी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी वनविभाग व वन्यजीव संरक्षण विभागाने प्राणी आणि पक्षांची मोजणी केली आहे. भंडारदरा व राजुर विभागाकडून या सदर्भात माहिती देण्यात आली आहे.

दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला प्राणी आणि पक्ष्यांची गणना केली जाते. त्यासाठी वेगवेगळ्या भागात जंगलांमध्ये उंच झाडांवर मचान बांधून तसेच मुख्य पानवठ्यावर मचान बांधून संपूर्ण रात्रभर पाणी पिण्यासाठी आणि जंगलात विहार करताना प्राण्यांची मोजणी केली जाते. तसेच विविध पक्षांच्या आवाजानुसार आणि यात पारंगत असलेल्या आदिवासी बांधवांच्या मदतीने पक्ष्यांची देखील मोजणी केली जाते. याही वर्षी वनविभागाने ही मोजणी केली.

या मोजणीची माहिती राजुर भंडारदरा वन्यजीव विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. या माहितीमध्ये राजुर विभागातील नोंदी पुढील प्रमाणे आहेत.
मुंगूस १८, सांबर ५३, ससा ३३, वानर २२४, कोल्हे ५, रानमांजर २०, तरस २१, माकड १५, खार २०, भेकर ६०, सांबर १२, घोरपड १, बिबट्या ५, उद् मांजर १, रानडुक्कर १५
घुबड १४, भारद्वाज ३१, होले ४५, बुलबुल ६८, बगळे २८०, टिटवी ३०, ससाणा ३, कावळे ८१, पारवे ४१, रान कोंबडी २७, लावरी ३, सुतार पक्षी २, घार ११, पान कोंबडी ५६, खंड्या १७, साळुंकी १७, राघू ४, धोबी २, कोतवाल १, वटवाघुळ १०

भंडारदरा विभागातील नोंदी पुढील पमाणे आहेत —
वानर १५९, खार ३९, ससा २३, रानमांजर १२, तरस १८, माकडं ११२, मुंगूस १४, रानडुक्कर ५९, भेकर ६, कोल्हा २२, रानगवा १, नीलगाय ३, सांबर १४, शेकरू ६, बिबट्या ७
बगळा ९६, लाव्हरी ११५, खंड्या २, साळुंकी ४३, कुंभार कुकडा १४, होला २४, घुबड ७, रान कोंबडी ५९, रांतांबी ६, मोर १९, कोकरुस ८, रान कोंबडा ४३, फेसा १, पानकोंबडी ७, केराई १४, वेगळी ३७, केगई २८, पेचूक ३७, बहिरू ससाणा २, बुलबुल ८, पारवा १२, चितुर पक्षी १४, काळचेटी ४०, सुतार पक्षी १६, कावळा ११९, कापू २, घार १

वरील प्रमाणे नोंदी असल्या तरी विविध कारणांमुळे व निसर्गातील बदलांमुळे सर्वच पक्षांची आणि प्राण्यांची गणना करण्यात अडचण निर्माण होत असते. तसेच प्राण्यांच्या मोजणीसाठी पानवठ्यांचा मुख्य आधार असतो. जंगलात जास्त प्रमाणात आणि घनदाट ठिकाणी जर पाणी साचलेले असेल तर प्राणी मुख्य पानवठ्यावर पाणी पिण्यासाठी येण्याचे प्रमाण कमी असते. त्यामुळे या गणनेत फरक पडू शकतो असेही या विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
