रतनवाडीत राज्यस्तरीय गिर्यारोहण शिबिर उत्साहात पार पडले !
प्रतिनिधी —
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळ आणि डॉ. डी.वाय. पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, आकुर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने रतनवाडी,कळसूबाई – हरिश्चंद्रगड अभयारण्य येथे महाराष्ट्राच्या पारंपरिक संस्कृतीतून आदिवासी सहजीवनाचा अभ्यास व गिर्यारोहण राज्यस्तरीय शिबिर उत्साहात पार पडले.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, उपाध्यक्ष डॉ. भाग्यश्री पाटील, सचिव डॉ. सोमनाथ पाटील, खजिनदार डॉ. रोहिणी पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ. अभिजित कुलकर्णी आणि प्राचार्य डॉ. मोहन वामन यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळ व प्राचार्य डाॕ. मोहन वामन हे १९९७ पासून कळसूबाई – हरिश्चंद्रगड अभयारण्यातील रतनवाडी या गावात राज्यस्तरीय गिर्यारोहण शिबिर घेत आहेत. शिबिराचे हे २७ वे वर्ष होते.

या शिबिरात राज्यभरातून २१० विद्यार्थ्यांनी व १२ प्राध्यापकांनी सहभाग नोंदवीला. शिबिरात सर्व विद्यार्थ्यांना रॕंपलिंगचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच रतनगडचे ट्रेकींग करण्यात आले. शिबिरार्थींसाठी विविध विषयावर तज्ज्ञ मान्यवरांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

विद्यार्थ्यांना सह्याद्रीतील देवराई या विषयावर डाॕ. महेंद्र ख्याडे, सह्याद्रीचा भौगोलिक माहिती आणि गिर्यारोहणाचे महत्व या विषयावर प्रा. गणेश फुंदे यांनी मार्गदर्शन केले. तर प्राचार्य डॉ. मोहन वामन यांनी विविध वनस्पती प्रत्यक्षात दाखवून त्या वनस्पतीबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. या शिबिरात प्राचार्य डॉ. संजय चाकणे प्राचार्य डॉ. काकासाहेब मोहिते, प्राचार्य डॉ. पंडित शेळके, प्राचार्य डॉ. बी. एन. पवार यांनी सहभागी होऊन रॕपलिंगचे प्रशिक्षण घेतले.

शिबिराच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सागर वैद्य, सत्यनिकेतन शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य टी.एन. कानवडे, रतवाडीचे माजी सरपंच पांढरे पाटील, सरपंच धनश्री झडे उपस्थित होते. प्रास्ताविक करताना प्राचार्य डॉ. मोहन वामन यांनी २७ वर्ष शिबिर घेत असतानाचा आढावा घेतला. सरपंच धनश्री झडे, प्राचार्य टी.एन कानवडे यांनी विद्यार्थ्यांवर सामाजिक बांधिलकी जपण्याचे संस्कार अशी शिबिरे करतात असे मत व्यक्त केले. सागर वैद्य यांनी मोठ्या इमारतीमध्ये शिक्षण घेणे तसेच कारकून आणि कामगार निर्माण करणारे शिक्षण देणे हे शिक्षण नव्हे तर या निसर्गाचा अभ्यास करणे या निसर्गाशी एकरूप होणे म्हणजे खरे शिक्षण होय असे मत मांडले. आभार विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. मुकेश तिवारी यांनी मानले.

शिबिराच्या नियोजनात डॉ. मिनल भोसले, प्रा. आरती पाटील, प्रा. करिश्मा सय्यद, प्रा. खालिद शेख, प्रा. मयुर मुरकुटे, प्रा. सतिश ठाकर, प्रा. रोहित वरवडकर, प्रा. आकाश शिर्के, प्रा. अभिषेक पोखरकर प्रा. राहुल थोरात, प्रा. शालिनी यादव यांनी सहभाग घेतला.
