आमदार थोरात यांनी केलेल्या निळवंडे धरण व कालव्यांमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद — डॉ.जयश्री थोरात
कोळवाडे येथे स्री शक्ती ग्रामसंघ भवनाचे उद्घाटन
प्रतिनिधी —
प्रत्येक कुटुंबाच्या आणि देशाच्या विकासात स्त्रियांचे मोठे महत्त्व आहे. 50 टक्के लोकसंख्या असलेल्या स्त्रियांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असून महिला निरोगी असली तर कुटुंब निरोगी राहते. तालुका हा एक परिवार म्हणून आमदार थोरात यांनी प्रत्येक गाव व वाडी वस्तीपर्यंत विकासाच्या योजना राबवल्या असून त्यांनी केलेल्या निळवंडे धरण व कालव्यांमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण झाला असल्याचे प्रतिपादन डॉ. जयश्री थोरात यांनी केले आहे.

कोळवाडे येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद व एकवीरा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्री ग्रामसंघभवन उद्घाटन व तिळगुळ प्रसंगी कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर डॉ. हसमुख जैन, गटविकास अधिकारी अनिल नागणे, पंचायत समिती सदस्य काशिनाथ गोंधे, भाऊसाहेब नवले, सोपान वर्पे, पुष्पा गुंजाळ, बाबुराव गोंधे, मुख्याध्यापक दशरथ वर्पे, निलेश कोकाटे, रवींद्र खलाटे, योगेश गुंजाळ, मंगेश वर्पे, शैला घोडे, कल्याणी कुदळ, अभिजीत गंभीरे, महेश पारधी, वनिता काटे, भाग्यश्री बांबळे आदी उपस्थित होते.

प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी निमित्ताने कोळवाडे येथील वीस बचत गटांच्या माध्यमातून उभारलेल्या स्री शक्ती महिला ग्राम संघ भवनाचे उद्घाटन यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमासाठी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

थोरात म्हणाल्या की, संगमनेर तालुका हा राज्यातील प्रगतशील तालुका म्हणून ओळखला जातो .या तालुक्याच्या विकासातही महिलांचे मोठे योगदान आहे. तालुक्यातील सर्व महिला या खूप कष्टाळू आहेत. सकाळी लवकर उठण्यापासून संध्याकाळी उशिरापर्यंत शेतीची अनेक कामे त्या सांभाळतात. मात्र हे सर्व करताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. स्त्रियांचे आरोग्य चांगले असेल तर कुटुंबाचे आरोग्य चांगले राहते. कॅन्सर बाबत वाढता प्रादुर्भाव हा अत्यंत चिंताजनक असून महिलांनी कोणतीही गाठ आली तर त्वरित आपल्या जवळच्या व्यक्ती किंवा डॉक्टरांना सांगितले पाहिजे कॅन्सरवर पहिल्या टप्प्यामध्ये पूर्णपणे मात करता येते.

कोणतीही गाठ असेल किंवा आरोग्याबाबत कधीही मला संपर्क करा असे सांगताना संगमनेर तालुक्याच्या विकासासाठी आमदार बाळासाहेब थोरात यांनी अविरत काम केले असून सर्वात मोठ्या असलेल्या या तालुक्यातील प्रत्येक गावात व वाडी वस्तीवर विकासाच्या योजना पोहोचवले आहेत. अनेक मोठमोठी विकास कामे मार्गी लावताना समृद्ध सहकार उभारला आहे. सहकारामुळे संगमनेर तालुका हा देश पातळीवर ओळखला जातो. याचबरोबर दुष्काळी भागाला वरदान ठरणारे निळवंडे धरण आली कालवे आमदार थोरात यांनी पूर्ण केले असून या कालव्यांचे पाणी आता शेतात येत आहे. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेत मोठा बदल होणार आहे. एक तालुका एक परिवार ही संकल्पना आपल्या तालुक्याची असून प्रत्येक कुटुंबाच्या सुखदुःखात आमदार थोरात सहभागी होत असतात. सर्व धर्म समभाव व सर्वांना समान संधी असल्यामुळे संगमनेर तालुका हा सुसंस्कृत वैभवशाली व विकसित तालुका म्हणून राज्यातला ओळखला जात असल्याचेही त्या म्हणाल्या.

गटविकास अधिकारी अनिल नागने म्हणाले की, संगमनेर तालुक्यात उमेश अनेक बचत गटांची स्थापना झाली असून यामधून महिला सक्षमीकरणा मोठा वाव मिळाला आहे. अनेक महिलांनी छोटे-मोठे व्यवसाय सुरू केले असून यातून कुटुंबासाठी त्या हातभार लावत असल्याचेही ते म्हणाले.या वेळी कल्याणी कुदळ यांनीही मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दशरथ वर्पे यांनी केले. सूत्रसंचालन दिलीप बांबळे व अश्विनी गुंजाळ यांनी केले. तर मंगल कुदळ यांनी आभार मानले. यावेळी कोळवाडे व परिसरातील महिला नागरिक युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
