अंगणवाडी कर्मचारी सभेचा अकोले तहसील कार्यालयावर धडक मोर्चा !
सरकारने त्वरित मागण्या मान्य करण्याची मागणी
प्रतिनिधी —
अंगणवाडी कर्मचारी सभे तर्फे अकोले आणि राजुर प्रकल्पातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष सत्यभामा थिटमे, तालुका अध्यक्ष बेबी हरनामे, साथी अनिल शिंदे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला.

४ डिसेंबर २०२४ पासून महाराष्ट्रातील दोन लाख दहा हजार अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावर आहेत. संपाला ४३ दिवस झाले आहेत. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन वाढ मिळावी, दरमहा पेंशन मिळावे, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालनुसार ग्रॅच्युइटी मिळावी, आहार दरात वाढ व्हावी इत्यादी मागण्यांसाठी हा संप सुरु आहे.

सरकारने मागण्या मान्य करुन संपावर योग्य तोडगा काढण्याऐवजी सरकारने कर्मचाऱ्यांना नोटीस दिल्या. त्यामुळे कर्मचारी महिलांमध्ये प्रचंड असंतोष पसरलेला आहे. मोर्चात सरकार विरोधी जोरदार घोषणा देत कर्मचाऱ्यांनी असंतोष व्यक्त केला. नोटिसा मागे घेण्याची मागणी केली.

मोर्चा समोर जिल्हाध्यक्ष सत्यभामा थिटमे, संगमनेर तालुका अध्यक्षा भारती धरत, ॲड. अनिल शिंदे, राजूर प्रकल्प उपाध्यक्ष अनुसया वराडे, बेबी हरनामे, चंद्रकला फापाळे, शकुंतला देशमुख, आशा खरात, नंदा देशमुख, मंगल लांडे, सोनू तळपाडे, कल्याणी देशमुख, संगीता बोडके, निशा साबळे इत्यादींची भाषणे झाली. सर्वच वक्त्यांनी सरकारने त्वरित मागण्या मान्य केल्या नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी तहसीलदार अकोले यांना निवेदन देण्यात आले.

