चंदनापुरी घाटात अल्पवयीन मुलीची हत्या !
चार संशयतांची चौकशी सुरू
प्रतिनिधी —
संगमनेर तालुक्यातील जुन्या पुणे नाशिक महामार्गावरील चंदनापुरीच्या घाटात आढळून आलेल्या अल्पवयीन मुलीच्या मृतदेहाची ओळख पटली असून तिचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार संशयतांची चौकशी देखील केली असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली आहे.
मयत मुलीच्या नातेवाईकांनी अंत्यविधी करण्यास नकार दिल्याने पोलिसांनीच त्या मयत मुलीचा अंत्यविधी केला आहे.

निर्मला राजेंद्र कदम (वय १५) असे मयत मुलीचे नाव असून ती मूळची राहता तालुक्यातील ममदापूर या ठिकाणची रहिवासी आहे. मात्र सध्या ती परिवारासह संगमनेर शहरातील ज्ञानमाता विद्यालय परिसरात राहण्यास होती.
दोन दिवसापूर्वी चंदनापुरी घाटात एका मंदिराच्या पाठीमागे या मुलीचा मृतदेह आढळून आला होता. तिची ओळख पटू नये म्हणून निर्घृण पणे खून करून तिचा चेहरा विद्रूप करण्यात आला होता. पोलिसांपुढे तिची ओळख पटविणे आणि पुढील तपास करणे याचे आव्हान निर्माण झाले होते.

दरम्यान शवविच्छेदनानंतर या मुलीचा खून झाला असल्याची माहिती पुढे आली. पोलिसांनी दोनच दिवसात तपास करून हा खून झाल्याचे उघडकीस आणले व त्याप्रकरणी चार संशयीतांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कडून विचारपूस देखील सुरू केलीआहे.

