राज्यात तातडीने शिक्षक भरती करावी — माजी आमदार डॉ. तांबे
प्रतिनिधी —
शिक्षण हे समाज विकासाचे प्रभावी माध्यम आहे. राज्यात प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. याचा परिणाम थेट गुणवत्तेवर होत असून सरकारने जारी केलेले ७ जुलै २०२३ चे परिपत्रक रद्द करून तातडीने राज्यात शिक्षक भरती करावी अशी आग्रही मागणी नाशिक पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केली असून तातडीने भरती न केल्यास राज्यभरात मोठा उद्रेक होईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.

डॉ. तांबे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना पत्र लिहून तातडीने १०० टक्के शिक्षक भरती करण्याची मागणी केली आहे.

या पत्रात तांबे यांनी म्हटले आहे की, राज्यभरात प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांच्या मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त आहेत. मध्यंतरी शासनाने विनाअनुदानित शाळांना टप्पा अनुदान देण्याचा चांगला निर्णय घेतला. परंतु या शाळांना अद्याप अनुदान मिळाले नसून सर्व शाळांना शंभर टक्के अनुदान देणे आवश्यक आहे.

तसेच शिक्षण विभागाचे अनेक प्रश्न शासन स्तरावर प्रलंबित असून त्यामध्ये प्रामुख्याने पेन्शन योजना, शाळांना वेतनेतर अनुदान दिले जात नाही. शिक्षकेतर कर्मचारी भरती सुद्धा अनेक वर्षापासून बंद आहे. तसेच शाळेमध्ये विषयानुसार कला व क्रीडा शिक्षक नाहीत. त्याचबरोबर शिक्षण विभागाचे अनेक इतर प्रश्नही प्रलंबित आहे त्यावर कुठलाही निर्णय घेतला जात नाही.

त्यातच शासनाने पत्रक काढून राज्यातील शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीने शिक्षक नेमण्याचा जो निर्णय घेतला आहे. तो अत्यंत चुकीचा आहे. राज्यात शिक्षकांच्या मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त आहेत. वर्गात शिकवण्यासाठी शिक्षक नाहीत. त्यामुळे शाळा चालवणे अवघड झाले असून अनेक युवक शैक्षणिक पात्रता असूनही या जागांपासून वंचित आहेत. या सर्व गोंधळाचा परिणाम संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर होत असून याचा गुणवत्तेवर अतिशय गंभीर परिणाम होत आहे. राज्यातील शिक्षण संस्था चालकांमध्ये सुद्धा असंतोषाचे वातावरण आहे.

तरी सरकारने शालेय शिक्षण विभागाचे परिपत्रक रद्द करून तातडीने राज्यात शिक्षक भरती करावी. अशी भरती केली नाही तर पदवीधर व पात्र तरुणांचा मोठ्या प्रमाणात उद्रेक होऊन राज्यभरात मोठे आंदोलन होईल व यास शासन जबाबदार राहील तरी सरकारने तातडीने हे परिपत्रक रद्द करून एका महिन्याच्या आत शंभर टक्के शिक्षक भरती करावी अशी मागणी माजी आमदार डॉ. तांबे यांनी केली आहे.

आमदार डॉ सुधीर तांबे यांनी सातत्याने शिक्षण विभागातील विविध प्रश्नांसंदर्भात विधानपरिषद आवाज उठवून सरकारचे लक्ष वेधले होते. राज्यभरातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी माजी आमदार डॉ तांबे यांचा पाठपुरावा कायम असून त्यांनी केलेल्या या मागणीबद्दल नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार ,अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटना व संस्थाचालक संघटनांनी ही माजी आमदार डॉ तांबे यांचे अभिनंदन केले आहे.

