घातपात झाल्याचा खोटा फोन करून पोलिसांना कामाला लावले….!
एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल…!!
प्रतिनिधी —
पोलीस ठाण्याची पायरी चढू नये असे म्हणतात. पोलिसांना मित्रही करू नका आणि दुश्मनही करू नका असेही म्हटले जाते. त्यामुळे पोलिसांपासून दोन हात लांब असणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना पोलिसांविषयी नेहमीच कुतूहल, भीती आणि आश्चर्य वाटत आले आहे. मात्र त्या पोलिसांना खोटा फोन करून कामाला लावले तर..?
अशी घटना संगमनेर तालुक्यात घडली आहे.
वृद्ध व्यक्तीचा नैसर्गिक मृत्यू झालेला असतानाही पोलीस कंट्रोल रूम ला खोटा फोन करून घातपात झालेला आहे असे कळवून पोलिसांची धावपळ करणाऱ्या आणि पोलिसांना कामाला लावणाऱ्या संगमनेर तालुक्यातील एका व्यक्तीविरुद्ध ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
शिवाजी बापू यादव (राहणार कौठे कमळेश्वर, ता. संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, अहमदनगर पोलीस कंट्रोलला फोन करून शिवाजी यादव याने संतु लक्ष्मण यादव यांचे प्रेत घरात पडलेले असून त्यांचा घातपाताने मृत्यू झाला असावा असे कळवले.
त्यामुळे पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन पोलीस कर्मचाऱ्यांना या संदर्भात माहिती घेऊन वस्तुस्थित पाहण्यास पाठवले.
पेट्रोलिंग करणारे पोलिस घटनास्थळी पोहोचले असता संतु लक्ष्मण यादव यांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. मात्र त्यांचा मृत्यू नैसर्गिक रित्या झाला असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. त्याच्या प्रेताजवळ त्याची पत्नी, मुलगा, सुन असे असल्याचे दिसून आले.
सदर नातेवाईक यांनी पेट्रोलिंग कर्मचारी यांना ते वयोवृद्ध झाले असल्याने नैसर्गिक रित्या मरण पावले आहेत. त्यांची प्रकृती सायंकाळी खालावल्याने त्यांना दूध पाजताना त्यांचा मृत्यू झाला असे सांगितले.
तरीही खात्री करण्यासाठी पेट्रोलिंग कर्मचाऱ्यांनी फोन करणाऱ्या शिवाजी बापू यादव यांच्याकडे पुन्हा विचारपूस केली असता आमचे शेतीचे वाटप अद्याप झालेले नाही. त्याचा घातपात झाला असावा. त्यांचे पीएम व्हायला पाहिजे असे पुन्हा पोलिसांना सांगितले.
त्यानंतर पोलिसांनी मयताला ग्रामीण रुग्णालय घुलेवाडी येथे आणले त्या ठिकाणीसुद्धा प्रथमदर्शनी सदर वृद्धाचा मृत्यू नैसर्गिक रित्या झाला असल्याचे आढळून आले.
त्याबाबत मयताचा मुलगा बाळासाहेब यादव यांनी मयताचे मृत्यूबाबत पोलीस स्टेशनला खबर दिली. त्यानंतर रीतसर अकस्मात मृत्यू नोंद करून. खात्री करण्यासाठी पोलिसांनी कॉटेज हॉस्पिटल येथील जाऊन त्याचा इनक्वेस्ट पंचनामा व चौकशी फॉर्म भरून दिला व लेखी पोस्टमार्टम रिपोर्ट घेतले.
या रिपोर्ट मध्ये सुद्धा मृत्यू हा वृद्धापकाळाने नैसर्गिकरित्या झाल्याचेच कळविण्यात आले.
त्यामुळे कौठे कमळेश्वर येथील संतू लक्ष्मण यादव (वय ८०) यांचा मृत्यू नैसर्गिक रित्या झालेला असल्याची खात्री झाली.
याप्रकरणी पोलिसांची दिशाभूल करून पोलिसांना विनाकारण कामाला लावल्याचे लक्षात येताच संबंधित शिवाजी बापू यादव या व्यक्तीने पोलिसांना खोटी माहिती देऊन पोलिसांच वेळ वाया घालवला व पोलिसांना त्रास दिला त्याबद्दल यादव याच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
यादव याने असे का केले ? हे आता पुढील तपासात निष्पन्न होणार आहे
यादव याच्या फोनमुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली आणि पोलिसांना नाहक कामाला लावल्याचे यातून दिसून आले आहे.
