मराठी माध्यमाचे शिक्षण दर्जेदार — डॉ. श्रद्धा वाणी
प्रतिनिधी —
जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदार, डॅाक्टर्स आदि उच्च पदावरील क्षेत्रात मराठी माध्यमाचीच मुले जास्त आहेत. त्यामुळे आजही मराठी माध्यमाचेच शिक्षण दर्जेदार आहे. शिक्षणाच्या वाटचालीतील पहिली पायरी १० वी असून ही पायरी यशस्वी पणे जास्तीत जास्त गुणांनी उत्तीर्ण व्हावे अशा सदिच्छा अहमदनगर जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा डॅा. श्रद्धा वाणी यांनी दिल्या.

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथील रयत शिक्षण संस्थेच्या मु. बा. वलवे लोकमान्य विद्यालयातील इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभात प्रमुख वक्त्या म्हणून डॅा. श्रद्धा वाणी बोलत होत्या. अध्यक्षस्थानी धांदरफळच्या लोकनियुक्त पहिल्या महिला सरपंच उज्वलाताई देशमाने होत्या.

स्थानिक स्कूल कमेटी अध्यक्ष मनोज कवडे, मुख्याध्यापक कापडणिस, शिरीष कवडे, किरण वाकचाैरे, नितिन देशमुख, उल्हास शिंदे, सतिष तोरकडी, आदि उपस्थित होते.

डॅा. वाणी म्हणाल्या कि, नर्सरी पासून ड्रेस कोर्ड सह सर्व सुविधा इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थीना उपलब्ध असतानाही ग्रामीण भागातील मराठी माध्यमातील मुलांची गुणवत्ता त्यापेक्षा आधिकच असते. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थीचे आरोग्यही उत्तम पाहवयास मिळते. या विद्यार्थीच्या चेहऱ्यावर तेज पाहावयास मिळते. आज जिल्हाधिकारी, इंजिनियर क्षेत्रातील बहुतांश लोक मराठी माध्यामातून शिक्षण घेऊन पुढे आलेले दिसतात.

माझेही प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषदेच्या शाळेतच झालेले आहे. तुम्हीही कसलीही भीती मनात बाळगू नका, उज्वल यश प्राप्त करु शकता.१० वी ची परीक्षा म्हणजे जीवनातील शिक्षणाचा प्रमुख टप्पा आहे. तेव्हा चांगला अभ्यास करा व चांगले गुण मिळवून उत्तीर्ण व्हा.
सद्या स्पर्धेचे युग आहे तेव्हा स्पर्धा परीक्षेची तयारी आता ८ वी पासूनच सुरु करावी लागते त्यासाठी प्रत्येक गावात, प्रत्येक शाळेत एक लायब्ररी असली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

स्कूल कमेटी अध्यक्ष मनोज कवडे म्हणाले कि, सद्या स्पर्धेचे युग आहे. त्यामुळे या काळात मुलांची गुणवत्ता महत्वाची आहे. विद्यार्थ्यांनी गुणवत्ता वाढवावी. जास्तीत जास्त गुण मिळवावेत. व सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन विद्यालयाचा निकाल १०० टक्के लावावा. तसेच येथेच प्रवेश घेऊन कनिष्ठ महाविद्यालयाची ११ वीच्या वर्गातील ॲडमिशन क्षमता पूर्ण करावी असे अवाहन केले.

निरोप समारंभाचे सुत्रसंचलन व आभार १० वीच्या विद्यार्थ्यीनीनी केले. कार्यक्रमाचे सर्व नियोजनही १० वीच्या विद्यार्थ्यांनीच केले. विद्यार्थ्यांनी निरोप समारंभात आपण शिकत असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या मु. बा. वलवे लोकमान्य विद्यालयास एक पेटी, तबला व साहित्य भेट देत शाळेत संगीत शिक्षण मिळावे हा संदेश दिला.

