काँग्रेस बंडखोर उमेदवाराला पाठिंबा देणार नाही !

सत्यजीत तांबेंबाबत नाना पटोलेंचं मोठं विधान

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

नाशिक पदवीधर मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीकडून काँग्रेसला देण्यात आली होती. यानंतर काँग्रेसने उमेदवार म्हणून पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नावाची घोषणा केली. मात्र, सुधीर तांबेंनी मुलगा सत्यजीत तांबेंसाठी माघार घेतली आणि मुलाचा अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला. दरम्यान, काल झालेल्या या घडामोडींबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना काँग्रेस बंडखोर उमेदवारांना पाठिंबा देणार नाही अशी भूमिका जाहीर केली.

नाना पटोले नेमकं काय म्हणाले?

“कालच्या एकंदरीत घडामोडींवर आम्ही लक्ष ठेऊन होतो. याबाबत पक्षश्रेष्ठींना माहिती दिली होती. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील त्याप्रमाणे कारवाई केली जाईल. मात्र, बंडखोर उमेदवारांना काँग्रेसचा पाठिंबा राहणार नाही, हे स्पष्टपणे सांगातो, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे. आम्ही काँग्रेस पक्षाकडून सुधीर तांबे यांनी तिकीट दिलं होतं. त्यांनी उमेदवारी अर्ज न भरात पक्षाबरोबर फसवेगिरी केली आहे. आपल्या मुलाचा अपक्ष अर्ज भरून त्यांनी सांगितलं की आम्ही भाजपाचा पाठिंबा घेणार आहे. ही एकप्रकारे काँग्रेसशी गद्दारी आहे, असेही ते म्हणाले.”

“हा सर्व ठरलेला कार्यक्रम”

“हा सगळा ठरलेला कार्यक्रम होता. सत्यजीत तांबे यांनी भाजपाला पाठिंबा मागितला. नाशिकमध्ये भाजपाने उमेदवारदेखील दिला नाही. यावरून हे स्पष्ट आहे. नाशिकमधील पदवीधर लोकं अडाणी नाहीत. त्यांनाही हे सर्व समजते आहे”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली. दरम्यान तांबे पितापुत्रांवर कारवाई होईल का? असं विचारलं असता, पक्षश्रेष्ठी याबाबत निर्णय घेतील अशी माहितीही पटोले यांनी दिली. तसेच “सर्वामागे भाजपाचा हात असून भीती दाखवून घरं तोडण्याचं काम सुरू आहे. याचा त्यांना आनंद वाटतो आहे. मात्र, जेव्हा भाजपाच्या नेत्यांची घरं फुटतील, तेव्हा त्यांना यांच दु:ख कळेल”, असेही ते म्हणाले. सौजन्य दैनिक लोकसत्ता

 

 

 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!