बारा शेळ्या आणि दोन बोकड चोरले !
पोलिसांचा तपास सुरू
प्रतिनिधी —
चक्क बारा शेळ्या आणि दोन बोकड चोरून नेण्याची घटना संगमनेर तालुक्यातील पठार भागात घडली आहे.

शेतकऱ्यांच्या शेतातून टोमॅटो, कांदा, डाळिंब अशा पिकांची चोरी होत असल्याच्या घटना वारंवार घडल्या आहेत. त्याचप्रमाणे विहिरीतील पाण्याचे पंप देखील चोरून नेले जात असल्याचे विविध प्रकार घडतात. मात्र पठार भागात अज्ञात चोरट्यांनी एका शेतकऱ्याच्या गोठ्यात बांधून ठेवलेल्या बारा शेळ्या आणि दोन बोकड चोरून नेल्याची घटना घडली आहे.

या शेळ्यांची आणि बोकडांची किंमत सुमारे २ लाख १० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी पठार या ठिकाणी ही घटना घडली असून सदाशिव विठ्ठल भोर यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. भोर यांच्या गोठ्यात बांधलेल्या १२ शेळ्या (काळया तांबड्या रंगाच्या) आणि दोन बोकड (तपकिरी व पांढरा रंगाचा) पहाटेच्या दरम्यान अज्ञात चोरांनी चोरून नेल्या असल्याची फिर्याद भोर यांनी दिली आहे.

गोठ्याचे कुलूप तोडून या शेळ्या पळवल्या असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. याप्रकरणी घारगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहाय्यक फौजदार आदिनाथ गांधले हे करत आहेत.

