म्हाळुंगी नदीतील अतिक्रमण हटवावे !
परिवर्तन सामाजिक संस्थेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
कार्यवाही करण्याचे तहसीलदारांचे मुख्याधिकाऱ्यांना आदेश
नवीन नगर रोड वरीलही अतिक्रमणे काढण्याची मागणी
संगमनेर | प्रतिनिधी —
संगमनेर शहरातून वाहणाऱ्या आणि पश्चिमेकडील असणाऱ्या म्हाळुंगी नदीच्या पात्रातील आणि आजूबाजूचे अतिक्रमण हटविण्यात यावे. तसेच नवीन नगर रोड व चौकातील अतिक्रमण काढून टाकण्यात यावे अशी मागणी परिवर्तन सामाजिक सेवा संस्थेचे साई नवले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानुसार संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे यांनी मुख्याधिकारी दयानंद गोरे यांना पत्र देऊन उचित कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संगमनेर येथील म्हाळुंगी नदीपात्रात काही समाजकंटकांकडून करण्यात आलेले बेकायदेशीर झोपडपट्टीचे अतिक्रमण कायद्यानुसार त्वरित हटवण्यात यावे. नदीपात्रातील या अवैध अतिक्रमणामुळे परिसरात विविध बेकायदेशीर आणि अनैतिक कृत्यांना खतपाणी मिळत आहे.
यासोबतच, संगमनेर शहराच्या मध्यवर्ती भागातील मुख्य रस्त्यांवर (विशेषतः नवीन नगर रोड चौक परिसरात) मोठ्या प्रमाणावर अवैध अतिक्रमणे झाली आहेत. यामुळे रोज वाहतुकीची कोंडी होऊन स्थानिक नागरिकांना व पादचाऱ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
तरी, सार्वजनिक सुरक्षितता लक्षात घेऊन आणि आपले नैसर्गिक स्रोत (नदीपात्र) सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने, या दोन्ही गंभीर बाबींवर जनहिताच्या दृष्टीने त्वरित व कठोर कायदेशीर कारवाई करावी. या मागणीनंतर प्रशासकीय पातळीवर हालचाली झाल्या असून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे.
